उस्मानाबाद :- फेक न्यूजमुळे देशाच्या समाजकारणावर, राजकारणावर प्रभाव पडत असतो. फेक न्यूज समाजबांधणीला हानीकारक ठरते.  त्यामुळे सद्सद्विवेकबुध्दीने बातमीची सत्यता पडताळण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची बनली आहे, असे प्रतिपादन ॲड. राज कुलकर्णी यांनी केले आहे.
  जिल्हा माहिती कार्यालय उस्मानाबाद व  पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने "फेक न्यूज परिणाम आणि दक्षता" या विषयावर जिल्हा माहिती कार्यालयात बुधवार दि. 1 ऑगस्ट 2018 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी श्री.कुलकर्णी बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप,  सायबर सेलचे श्री.सय्यद, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. कुलकर्णी पुढे म्हणाले, पत्रकारांचे काम समाजामध्ये ज्ञानाचा प्रकाश पोहोचविण्याचे असल्याने पत्रकारांनी फेक न्यूजपासून दूर राहिले पाहिजे. समाजमाध्यमांचे आणि त्यांच्या वापराचे प्रमाण वाढल्याने फेक न्यूजचेदेखील प्रमाण वाढले आहे. फेक न्यूज मुळे सर्वच घटकांवर विपरित परिणाम होत असल्याने परिणाम होऊन गेल्यानंतर त्याबाबतची सत्यता बाहेर येते. फेक न्यूजमुळे सामाजिक स्वास्थ बिघडते, त्यामुळे बातमीची सत्यता पडताळण्याची प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी आपल्या मनोगतात अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेशसिंह, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या सर्वांचे आभार मानले.कार्यशाळेच्या शेवटी फेक न्यूज कशा तयार केल्या जातात, त्याचा वापर कसा केला जातो, त्या कशा ओळखाव्यात याबाबत ॲड.राज कुलकर्णी यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्याविषयीही प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे शंका समाधान करण्यात आले.या कार्यशाळेस ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा, राजाभाऊ वैद्य, सय्यद सर, रतिलाल शहा, बाळासाहेब साळुंखे यांच्यासह प्रसारमाध्यमातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांना लोकराज्यचे वृक्षलागवड आणि वारी हे विशेषांक भेट स्वरूपात देण्यात आले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी केले तर आभार सायबर सेलचे श्री.सय्यद यांनी मानले.
 
Top