नळदुर्ग :- जनमाहिती अधिकारी पंचायत समिती कार्यालय यांना राज्य माहिती आयोग महाराष्ट्र राज्य खंडपीठ औरंगाबाद यांनी वेळेवर माहिती न दिल्याने एक हजार रुपये नुकसान भरपाई अपीलार्थीस आदेश प्राप्त होताच 30 दिवसाच्या आत माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दि. 1 ऑगस्ट 2017 रोजीच्या माहिती अधिकार अर्जान्वये नळदुर्ग येथील आरटीआय कार्यकर्ते अजीज फजल सय्यद यांनी तुळजापूर पंचायत समिती जनमाहिती अधिकारी यांच्याकडे निलेगाव ता. तुळजापूर येथील ग्रामपंचायतीने स्मशान भूमी बांधण्यासाठी जमीन संपादित केली, त्याचा पंचायत समिती कार्यालयात दाखल केलेला प्रस्ताव, शासनाकडून देण्यात आलेला निधी, जागेची मालकी गावठाण किंवा गायरान आहे, जमिन संपादित केली असेल तर जमीन मालकाला किती मोबदला देण्यात आला, अशी माहिती नोंदणीकृत टपालाद्वारे मागविली होती. मात्र जनमाहिती अधिका-यानी माहिती देण्यास विलंब लावल्याचे लक्षात आल्यानंतर मागितलेली माहिती न दिल्याने अजीज सय्यद यांनी पंचायत समितीचे विस्ताराधिकारी यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले. त्यानंतर अपीलार्थीने राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे द्वितीय अपील दाखल केले.
सदरप्रकरणी झालेल्या सुनावणीत उपलब्ध असलेल्या दस्ताऐवज व युक्तीवादावरुन अपीलार्थीच्या अर्जास जन माहिती अधिकारी यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, तसेच प्रथम अपिलीय अधिकारी यांनी अपिलार्थी यांच्या प्रथम सुनावणी घेवून निर्णय पारित केलेला नाही. ही बाब विचारात घेता अपील मंजुरीस पात्र ठरवून अपीलार्थीस माहिती देण्यास विलंब झाल्याप्रकरणी पंचायत समिती तुळजापूर जन माहिती अधिकारी यांना 30 दिवसात अपिलार्थीस नोंदणीकृत टपालाद्वारे माहिती पाठवावी, तसेच एक हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दि. 10 जुलै रोजी दिला आहे.