तुळजापूर (दास पाटील) :-
लोककला ही महाराष्ट्राची प्राचीन परंपरा आहे. ही कला जोपासणे, जिवंत ठेवणे आजची गरज आहे. यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, आणि लोककलावंतांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलू, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आ. मधुकरराव चव्हाण यांनी मराठवाडास्तरीय लोककला महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
रविवार दि. १९ रोजी राज्यव्यापी आराधी, गोंधळी, वाघ्या, शाहीर, भजनी परिषद मार्फत व महिषासुरमर्दिनी सांस्कृतीक लोककला मंच तुळजापूर आयोजित, मराठवाडास्तरीय पारंपारिक लोककला महोत्सवाचे उद्घाटन आ. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक अमर मगर, सुनिल रोचकरी, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंतराव कोंडो, काँग्रेस शहराध्यक्ष भारत कदम, माऊली भोसले, रणजीत इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. लोककलेसह विविध क्षेत्रात कार्य केलेल्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात सत्कारमूर्ती आरीफ सिद्दिकी, प्रा. डॉ.दिलीपराव गरूड, प्रदीप गारटकर, भालचंद्र रुपदास यांना देवीची प्रतिमा, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर परिषदेचे निमंत्रक तथा प्रांताध्यक्ष रांजेंद्र गोंधळी- गायकवाड, ह.भ.प. भास्कर महाराज, अॅड. शिवकुमार स्वामी, प्रकाश सोनवणे, पुरुषोत्तम कुरुलकर, सतीश भिसे, श्रीकांत रसाळ, महिला आघाडी अध्यक्षा मिराताई गायकवाड, लताताई गिरी, शुभांगी कलशेट्टी, पुष्पा म्हेत्रे उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात आप्पासाहेब पाटील यांनी, लोककला टिकण्यासाठी या कलावंतांना आर्थिक पाठबळ मिळणे गरजेचे आहे. यासाठी काँग्रेस पक्ष सर्वतोपरी परिषदेस सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.
उद्घाटनपर भाषणात आ.चव्हाण यांनी, लोककलाकारांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहेत. या मागण्यांसाठी परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करू. आणि यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक राजेंद्र वनारसे यांनी केले. तर सूत्रसंचालन पांडुरंग लाटे यांनी केले. आभारप्रदर्शन संयोजक ह.भ.प. काकासाहेब पाटील महाराज यांनी केले.
उद्घाटन सोहळ्यानंतर सोलापूर येथील लोककलावंतांनी देवीचे गोंधळ गीत सादर करून महोत्सवास आरंभ केला. यानंतर विविध कलावंतांनी आराधी गीते, वाघ्या मुरळी गीते, पोवाडे, भारुडे, वासुदेव गीते कवने सादर केली.