शासनाच्या कृषी विभागाने नाकारल्यानंतर जिद्दीने पेटून उठलेल्या तरुण शेतक-याने कृषी विभागाच्या नाकावर टिचून इस्त्राईल पध्दतीने 3 हजार सुपर केशरी जातीच्या आंब्याची दोन एकरात लागवड करत आपली विजीगिषु वृत्ती दाखवत नाविन्याचा शोध घेवून शासनाच्या उदासिन धोरणामुळे नाराज होवून आत्महत्या करणा-या शेतक-यांसाठी एक अभिनव मार्ग दाखवला. पारंपारिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे चला हा मंत्र तुळजापूर तालुक्यातील सुरवसे या शेतकरी कुटूंबियांनी मराठवाडयातील सर्व शेतक-यांना दिला आहे.
महाराष्ट्र शासनाने दि. 31 जुलैपर्यंत 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. ते कितपत साध्य झाले हा भाग सोडला तर उस्मानाबाद जिल्हयातील सराटी ता. तुळजापूर येथील एका शेतकरी कुटूंबाने शासनाच्या फळबाग लागवड अनुदानाची वाट न पाहता आपल्या मालकीच्या शेतजमिनीपैकी दोन एकर शेतात 3 लाख 50 हजार रुपये खर्चून 3 हजार सुपर केशरी जातीच्या आंब्याची इस्त्राईल पध्दतीने लागवड केली आहे. तालुक्यातील सराटी गावातील रविंद्र हरीबा सुरवसे या अल्पभूधारक शेतक-याच्या कुटूंबांचा 2 एकर शेतजमीनीवरच उदरनिर्वाह आहे. आतापर्यंत ते पारंपारिक पध्दतीनेच शेती करीत असत.
![]() |
अक्षय सुरवसे |
मराठवाडा हा अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो. त्यात उस्मानाबाद जिल्हयात नेहमीच पावसाचे प्रमाण कमी असते. अशा दुष्काळजन्य उदभवणा-या परिस्थितीशी जुळवून घेत पारंपारिक पध्दतीने खरीप व रब्बी हंगामात येणारे पीके, त्यातून मिळणारे तुटपुंज्य उत्पन्न यावरच समाधान न मानता त्यांनी आधुनिक पध्दतीने शेती करण्याचा निश्चय केला. या दोन एकर मध्ये दोन भावंडाचे कुटूंब अवलंबून आहे. त्यांचे बंधू सुरेश सुरवसे हे सैन्य दलात आहे. नौकरी निमित्त ते गाव सोडून पुणे येथे वास्तव्यास गेले. पुण्यात वास्तव्यास असले तरी त्यांनी गावाकडची नाळ तुटू दिली नाही. सध्या कमी पर्जन्यमान असल्यामुळे शेतीत म्हणावे तसे उत्पन्न मिळत नाही. म्हणून आधुनिक पध्दतीची शेती कशी करता येईल? या विषयी अक्षय सुरवसे यानी शोध घेवून कमी क्षेत्रात, कमी वेळेत पारंपारिक शेती पध्दतीला फाटा देवून आधुनिक पध्दतीने अधिक उत्पन्न देणा-या सुपर केशरी जातीच्या आंब्याची इस्त्राराईल पध्दतीने लागवड केल्यास अधिक उत्पन्न मिळते. याविषयी नाशिक येथे जावून त्यांनी माहिती जाणून घेतली व रविंद्र सुरवसे यांच्या नावे आंबा फळबाग लागवडी करीता प्रस्ताव संबंधित कृषी कार्यालयाकडे पाठवला. परंतू अनेकवेळा चकरा मारुनही शासनाच्या संबंधित कृषी कार्यालयाने त्यांची दखल घेतली नाही. तेंव्हा शासनाच्या अनुदानाची वाट न पाहता स्वखर्चातून आंब्याची लागवड करण्याचा निर्णय अक्षय यांच्या पुढाकारातून सुरवसे कुटूंबियानी घेतला. गुजरात येथून त्यांनी स्वखर्चातून 3 हजार सुपर केशरी जातीच्या आंब्याची 2 लाख 50 हजार किंमतीचे रोपे मागवली व आपल्या दोन एकर शेतजमीनीत इस्त्राराईल पध्दतीने 1 लाख रुपये खर्चून लागवड केली आहे.
आंब्याची लागवड करताना प्रारंभी तीन फुट खोल खडडे खणून घेतले. त्यात शेणखत व रासायनिक खताचा वापर करण्यात आले. दोन झाडात तीन फुटाचे अंतर आहे. तर झाडांच्या दोन रांगेमधील अंतर दहा फुटाचे आहे. जुलैमध्ये लावण झाली असून पुढच्या वर्षी जुलैमध्ये छाटनी करणार असून झाडांची उंची सात फुटापर्यंत ठेवायचे आहे. या इस्त्राईल पध्दतीने लावण केल्यामुळे कमी खर्च, कमी जमीन, कमी पाणी याप्रमाणे वापर करुन भरघोष उत्पन्न मिळणार आहे.
शिवाजी नाईक
संपादक