उस्मानाबाद : नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याला भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया राबविण्याचे पत्र साखर आयुक्तांनी दिले आहे. मात्र या पत्रात जिल्हा बँकेच्या कर्जाचा व वसुलीचा कोणताच उल्लेख नाही. साखर आयुक्तांनी दिलेल्या या द्विपक्षीय पत्राच्या विरोधात सहकार मंत्री व आयुक्तांकडे दाद मागण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
शेतकरी, कष्टक-यांची बँक म्हणून ओळखली जाणारी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या सलाईनवर आहे. रोखे घोटाळे, विना तारण कर्ज वाटप यासह इतर कारणांनी अडचणीत आलेल्या बँकेला उर्जितावस्था देण्यासाठी व ठेवीसाठी दररोज बँकेला दारात चकरा मारणा-यांना दिलासा देण्यासाठी कर्जवसुली हाच एकमेव पर्याय राहिला आहे. मदतीसाठी वेळोवेळी पाठविलेल्या प्रस्तावाला शासनाकडून ठेंगा दाखविण्यात आला. त्यामुळे बँकेने कर्जवसुलीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. विशेषत: ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना व नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे 400 कोटी रुपयांच्या जवळपास कर्ज व व्याज कथित आहे.
तेरणा व तुळजाभवानी साखर कारखानाने भाडेतत्वावर चालविण्यास देवून येणा-या रक्कमेतून कर्जाची वसुली व्हावी, असा ठराव घेवून बँकेने शासनाकडे पाठविला होता. तेरणा कारखान्याचा तडजोड मसुदा मंजूर व्हावा, यासाठी बैठकांवर बैठकांचे फड रंगले तरी हा मसुदा अद्यापही शासकीय लालफितीत अडकला आहे. दुसरीकडे नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया शासन निर्देशानुसार हाती घेण्यात आली आहे.
कारखाना भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी साखर आयुक्तांनी जे पत्र दिले आहे. त्या पत्रात मात्र जिल्हा बँक व बँकेच्या कर्जाचा कोणताही नामोल्लेख झालेला नाही. या विषयावर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सोमवारी आयोजित बैठकीत मोठी चर्चा करण्यात आली. सहकारी मंत्र्यासमवेत झालेल्या बैठकीत हा कारखाना भाडेतत्त्वावर देताना त्रिपक्षीय संमतीसह इतर विषयांवर चर्चा झाली होती. मात्र साखर आयुक्तांनी द्विपक्षीय पत्र काढल्याने कर्ज वसुलीवर प्रश्न चिन्ह उपस्थित राहत आहे.
यामुळे या पत्रावर आक्षेप घेत बँकेच्या कर्जाच्या वसुलीबाबतचा नामोल्लेख असलेले पत्र दयावे, यासाठी सहकारमंत्री व साखर आयुक्तांकडे दाद मागण्याचा निर्णय बैठकीस उपस्थित संचालकांनी एकमताने घेतला आहे. त्यामुळे श्री तुळजाभवानी कारखान्याच्या गळीत हंगामाबाबत पुन्हा साशंकता निर्माण झाली आहे.
सहकार मंत्र्यासोबत लवकरच बैठक
श्री तुळजाभवानी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी जिल्हा बँकेनेच सर्वप्रथम ठराव घेवून शासन दरबारी मांडला होता. सहकारमंत्री, साखर आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत कारखाना भाडेतत्वावर देताना बँकेला विश्वासात घेवून प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय झाला होता. मात्र साखर आयुक्तांनी द्विपक्षीय पत्र दिले असून बँकेच्या कर्जाचा उल्लेख कोठेच नाही. त्यामुळे कर्ज वसुलीबाबत आता सहकारमंत्री व साखर आयुक्तांकडे दाद मागणार मागणार असल्याचे चेअरमन सुरेश बिराजदार यांनी सांगितले.
साभार - दै. लोकमत
 
Top