तुळजापूर (दास पाटील) :-
तालुक्यातील काक्रंबा येथील संजीवनी माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींनी राखी पौर्णिमेच्या सणाचे औचित्य साधून सुमारे दोनशे सुंदर राख्या बनवल्या आहेत.
कार्यानुभव व कौशल्य विकास अभियान अंतर्गत विद्यार्थी, विद्यार्थिनींमध्ये कल्पकता वाढावी, त्यांच्या उपजत कला गुणांना वाव मिळावा, या हेतूने हा उपक्रम घेण्यात आला.
राखी तयार करण्याच्या कार्यशाळेत इ.आठवी ते इ.दहावीतील ४० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी आवश्यक साहित्य शाळेतील शिक्षकांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिले.विविध रंगांचे दोरे, मणी आदींच्या सहाय्याने या राख्या बनवल्या आहेत. हस्तकलेच्या या उपक्रमात विद्यार्थिनींनी दोनशे सुंदर राख्या तयार केल्या आहेत.
येत्या रक्षाबंधन सणादिवशी शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्याप्रसंगी विद्यार्थिनी या हस्तकलेने बनवलेल्या राख्या शाळेतील शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांना बांधणार आहेत, अशी माहिती मुख्याध्यापक ए.टी. राऊत यांनी दिली.
या उपक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील कार्यानुभव शिक्षक एच.झेड. जाधव, आर. व्ही. भोसले यांनी परिश्रम घेतले.