नळदुर्ग :- व्यसनमुक्त, अंधश्रध्दा व कर्मकांड विरहित बुध्दीजीवी समाज निर्मितीसाठी तथागत भगवान बुद्धांच्या विचाराची गरज असून प्रत्येकानी त्यांनी सांगीतलेल्या पंचशील तत्वाचे व अष्टांगीक मार्गाचे काटेकोरपणे पालन करणे काळाची गरज आहे, असे मत रिपाईचे जिल्हा सल्लागार एस. के. गायकवाड यांनी लोहगाव ता. तुळजापूर येथे व्यक्त केले.
बुद्धविहार समन्वय समिती उस्मानाबादच्यावतीने वर्षावास निमित्ताने लोहगाव ता. तुळजापूर येथे धम्म जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येथील जेष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड हे होते.
याप्रसंगी बुद्धविहार समन्वय समितीचे उस्मानाबाद जिल्हा समन्वयक मारूती बनसोडे यांनी धम्मजागृती अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. तसेच सामाजिक कार्यकर्ते आर. एस. गायकवाड, दयानंद काळुके, भिमशाहीर नागनाथ दुपारगुडे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अतुल लोखंडे यांनी केले.
या वेळी प्रकाश लोखंडे, परमेश्वर लोखंडे, शाम नागिले, संतोष नागिले, सोमनाथ बनसोडे, शांताबाई गायकवाड, प्रभावती लोखंडे आदीजण उपस्थित होते.