उस्मानाबाद, दि.20 :-  महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊनचा कालावधी दि. 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविला आहे. भारत सरकारने कोव्हिड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 3 मे, 2020 पर्यंत वाढविला आहे. कोरोना विषाणूचा (COVID-19) प्रादुर्भाव होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊनचे कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयांमध्ये होणारे दस्त नोंदणी व्यवहार दि. 3 मे, 2020 पर्यंत बंद करणेबाबत आदेशित केले होते. 

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांवर उपाययोजना करण्यासाठी  दि. 14 एप्रिल, 2020 रोमी उपमुख्यमंत्री  महोदयांच्या अध्यक्षतेखालील गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत सूचित केल्यानुसार सह जिल्हा निबंधक वर्ग 1 (नि.श्रे.) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, उस्मानाबाद  यांनी  जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयांमध्ये होणारे दस्त नोंदणी दि. 20 एप्रिल, 2020 पासून सुरु करणेबाबत विनंती केली आहे. 

जिल्हाधिकारी  दिपा मुधोळ-मुंडे यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार कोरोना विषाणूचा (COVID-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयांमध्ये होणारे दस्त नोंदणी दि. 20 एप्रिल, 2020 पासून सुरु करणेबाबत खालील अटी व शर्तींच्या आधारे परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूचा (COVID-19) प्रादुर्भाव होणार नाही या अनुषंगाने बायोमेट्रीक प्रणालीचा वापर करुन दस्त नोंदणी व्यवहार करीत असताना भारत सरकार, महाराष्ट्र शासन व आरोग्य विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. 


सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मास्क, स्वच्छ रुमाल, ग्लोव्हज, सॅनिटायझर, कागद, कापूस, पेपरबॅग इत्यादी साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात यावे. बायोमेट्रीक डिव्हाईस, दरवाज्याचे हॅण्डल्स, नोब्स, टेबल, खुर्ची इत्यादीचे सातत्याने निर्जंतुकीकरण (Sanitization) करत रहावे.  सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करावा तसेच साबणाने हात स्वच्छ धुवावेत. कर्मचाऱ्यांनी काम करताना डोळे, नाक व तोंडाला स्पर्श करणे टाळावे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना बायोमेट्रीक उपकरणाचा वापर करण्यापूर्वी व वापर केल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुण्यासाठी प्रेरित करावे व त्यासाठी नागरिकांना साबण व पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे. 


प्रत्येक दस्त नोंदणी  व्यवहार करताना बायोमेट्रीक उपकरणाचा वापर करण्यापूर्वी व वापर केल्यानंतर त्याचे निर्जंतुकीकरण (Sanitize) करण्यात यावे. 

बायोमेट्रीक उपकरण निर्जंतुक (Sanitize) करताना वापरलेला कापसाचा बोळा पेपर कव्हरमध्ये ठेवण्यात यावा आणि तो काळजीपूर्वक व पुरेशी दक्षता घेऊन नष्ट करण्यात यावा.  

दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना कुटुंबातील सदस्यांसह किंवा मित्रांसह समुदायाने दस्त नोंदणीसाठी न येता फक्त लिहून घेणार, लिहून देणार व्यक्ती आणि साक्षीदार एवढ्याच लोकांनी  दस्त नोंदणीसाठी  कार्यालयात येण्याची सूचना देण्यात यावी.  

दस्त नोंदणी कार्यालयातीलतील दोन कक्षांमधील, टेबलांमधील अंतर किमान दोन मिटर राहील याबाबत दक्षता घ्यावी. नागरिकांना त्यांचे नाक व तोंडावर मास्क, स्वच्छ रुमाल बांधणेबाबत सक्ती करावी तसेच रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये पुरेसे सामाजिक अंतर राहील यादृष्टीने मार्कींग करण्यात यावी. आवश्यकता असल्यास पोलीसांची मदत घेण्यात यावी. 

नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवणेबाबत शासनाने, आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना नागरिकांच्या सोईसाठी प्रदर्शित करण्यात याव्यात.      
सर्दी, ताप व श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात यावे. नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच दस्त नोंदणीसाठी यावे.

दस्त नोंदणी कार्यालयाने आपले पुरेसे कर्मचारी दस्त नोंदणी कामासाठी नेमावे. जेणेकरुन नागरिकांना कार्यालयामध्ये कमीत कमी वेळ व्यतीत करता येईल.  

दस्त नोंदणी  कार्यालयाने  एका दस्त नोंदणीसाठी आवश्यक तेवढ्याच नागरिकांना कार्यालयामध्ये येण्यास परवानगी द्यावी. प्रवेश केलेल्या नागरिकांचे काम झाल्याशिवाय पुढील नागरिकांना कार्यालयामध्ये येण्यास परवानगी देऊ नये. दोन व्यक्तींमध्ये रांगेत पाच फूट अंतर ठेवावे. 

60 वर्षांवरील नागरिकांनी आपल्या दस्त नोंदणी व्यवहारांसाठी  दि. 3 मे, 2020 पर्यंत शक्यतो दस्त नोंदणी कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊ नये. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सह जिल्हा निबंधक वर्ग 1 (नि.श्रे.) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांची राहील. 

या आदेशाचे उल्लंघन करणारी  व्यक्ती, संस्था अथवा संघटना “महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम, 2020” चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

हे आदेश आदेशाचे दिनांकापासून दि. 3 मे, 2020 पर्यंत लागू राहतील.
 
Top