जळकोट,दि२२ :  सध्या सर्वत्र कोरोना या महाभयंकर विषाणूने हाहाकार माजवलेला आहे. यामुळे जगातील  लाखो नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे.आपल्या राज्यासह देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा गंभीर परिस्थितीशी सामना करण्यासाठी सरकारने लाॅकडाऊन सुरू केलेले आहे. यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारकडून व दानशूरांकडून लोकांना धान्याचे वाटप करण्यात येत आहे. 

     लोकांना धान्यासोबतच किराणा मालाची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे.अशा कठीण प्रसंगी जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी किराणा दुकानदार हे किराणा मालाची चढ्या व वाढीव दराने विक्री करित आहेत.यामुळे अगोदरच कोरोनाच्या या भीषण संकटात सापडलेल्या सर्वसामान्य लोकांना नाहक आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. 

     या संपूर्ण गैरप्रकाराबाबत जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी निवेदन दिले असून त्यात अशा जनतेची लूटमार करणाऱ्या किराणा दुकानांची तपासणी करून लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात यावे व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.अशी मागणी केली आहे. मनसेच्या वतीने अशा किराणा दुकानदारांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून,नागरिकांनी अशा दुकानदारांची नांवे जवळच्या मनसे कार्यकर्त्यांना कळवावीत. लाॅकडाऊन संपल्यानंतर संबंधित किराणा दुकानदारांना धडा शिकवण्यात येईल.असेही शेवटी निवेदनात प्रशांत नवगिरे यांनी नमुद केले आहे
 
Top