मुरूम, दि.२५: या जागतिक महामारीमुळे लाखो लोक कोरोनाबाधित झाले आहेत.हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत.देशात ३० जानेवारीला केरळ राज्यात पहिला रुग्ण आढळला.हळूहळू सर्व देशात कोरोना पसरत गेला.आज देशात तेवीस हजारच्या वर कोरोनाबाधित रुग्ण तर महाराष्ट्रात ६८०० कोरोनाबाधित रुग्ण असले तरी कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाणही चांगले आहे.नुकतेच उस्मानाबाद जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते,सुदैवाने ते तिन्ही रुग्ण बरे झाले.त्यामुळे जिल्हा आता ग्रीनझोन मध्ये असल्याने नागरिकही समाधानी आहेत.तरीपण तरूणांनी स्वतःला परिस्थितीनुसार बदलणे आवश्यक असल्याचे शरणजी पाटील यांनी बोलताना सांगितले.
शरणजी पाटील पुढे बोलताना म्हणाले की,तरूणांनी कोरोना संसर्गाला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.कोरोना संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून केंद्र व राज्यसरकार अहोरात्र प्रयत्न करत आहे.कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा,पोलीस यंत्रणा, सफाई कर्मचारी आदी अतिशय तत्परतेने काळजी घेत आहेत.यामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसकडूनही वेगवेगळ्या पातळ्यांवर पदाधिकारी,कार्यकर्ते गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.राज्य सरकारही धोरणात्मक निर्णय घेत आहे.आज राज्यासमोर फार मोठे आर्थिक संकट उभे आहे.एका बाजूला लॉकडाऊन केल्याने सर्व उद्योगधंदे,व्यापार,बाजारपेठा बंद तर दुसऱ्या बाजूला लॉकडाऊन नंतर देशावर आर्थिक संकट येणार असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.अगोदरच देशात आर्थिक मंदीचे सावट असून सुद्धा सर्वपक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते अगदी उत्स्फूर्तपणे जनतेला वेगवेगळ्या प्रकारची अत्यावश्यक मदत करत आहेत.या कोरोना विषाणूचा नायनाट करावयाचा असेल तर सर्वांनी सामुदायिक प्रयत्न करण्याची गरज आहे.आपली भारतीय संस्कृती,विविधतेत एकता,राष्ट्रभक्ती,लोकशाही राष्ट्र,सामाजिक समता,स्वातंत्र्य,बंधूभाव ही मूल्य घेऊन जगात एक प्रगतशील राष्ट्र म्हणून इथला तरुण सातत्याने प्रयत्नशील आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र येऊन गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत करू या.आपण सर्वजण घरात बसूनच काळजी घेऊ या.सुरक्षित अंतर ठेवून स्वतःसोबत आपल्या कुटुंबाची व समाज बांधवांची काळजी घेवू या.केंद्र व राज्यसरकार,आरोग्य यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करू या. घरातील वृध्द व्यक्तिंची काळजी घेऊ या.देशाला कोरोना मुक्त करायचे असेल,तर सर्वांनी एकत्रित येऊन हा लढा लढला पाहिजे.सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून एकमेकांना सहकार्य करू या. चिंता करण्यापेक्षा एकमेकांची काळजी घेऊ या.सध्याची परिस्थिती अडचणीची तर आहेच परंतु अशा अडचणीच्या काळातच खऱ्या अर्थाने देशाला तरुणांची गरज असते.तेव्हा आपण सर्वजण मिळून जबाबदारीचे भान राखून देशाला व समाजाला या संकटातून बाहेर काढू या.संकटे ही संधी निर्माण करण्यासाठीच आलेली असतात हा सकारात्मक विचार युवकांनी स्विकारा.या आव्हानाचा मुकाबला सर्वांनी मिळून करू या.अजून तरी या कोरोना विषाणूवर खात्रीशीर औषध उपलब्ध झालेले नाही.निराशेत जगण्यापेक्षा धाडसाने या संकटाचा सामना करू या.'कामयाब होने के लिए अकेले ही आगे बढ़ना पडता हैंI' या वाक्याप्रमाणे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून घरीच राहून कोरोनाला हद्दपार करू या!असा संदेश ही शेवटी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील यांनी युवकांना दिला.