काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी परंतु पुणे, मुंबई, औरंगाबाद, जवळच्याच सोलापूर शहरात मांडलेले संसार जिल्हा सिमा बंद असूनही संसार डोईवर घेऊन आपल्या गावाची वाट धरत आहेत. परंतु शहरातील व्यक्तींना पहाताच ग्रामीण भागातील नागरिकांची धाकधूक वाढल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. कोरोनाचा प्रसार  रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. सर्वत्र जिल्ह्याच्या सिमा बंद असून आपल्या जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण आपल्या जिल्ह्यात येऊ नये जिल्हा अधिकारी दिपा मुधोळ मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हा प्रशासन सतर्क आहे. परंतु लॉकडाऊन  असून सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवरील असलेल्या काटी गावात पुणे, मुंबईसह शेजारील कोरोना बाधितांची संख्या वाढणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातून लोक येत आहेत. त्याच काटी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच आदेश कोळी यांच्यासह प्रमुख राजकीय पदाधिकाऱ्यांनी वारंवार सुचना करून येथील दुध विक्रेते, किराणा दुकानदार दररोज खरेदी,विक्रीच्या निमित्ताने सोलापूरला ये-जा करीत आहेत. सोलापूरला रुग्णांनांची संख्या वाढत असल्याने नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले. गावात येण्यासाठी सर्व मार्ग बंद करून एकच मार्ग ठेवला असला तरी चोरट्या मार्गाने किंवा रात्री बाहेरून लोक गावात येत आहेत. त्याच प्रमाणे काटी हे दोन जिल्ह्याच्या सरहद्दीवरील असल्याने शेजारील सोलापूर जिल्ह्यातील गावांमधील लोक किराणा साहित्याच्या खरेदीसाठी दररोज ये-जा करीत असून गावात पोलिस कर्मचारी एकच असल्याने नागरिकांना वचक राहिला नसल्याने लोक बिनधास्त बाहेर फिरताना दिसत आहेत. येथे पोलीस कर्मचारी वाढविण्याची गरज असल्याचे मत माजी सरपंच अशोक जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीला बोलताना व्यक्त केले.

      कोरोनाच्या धास्तीने आणि मुंबई, पुणेसह अन्य सर्व शहरातील उद्योगधंदे बंद पडल्याने आणि सार्वजनिक वाहतूक ठप्प झाल्याने लोक जमेल तसं गावाकडे स्थलांतरीत होत आहेत. गावात येणाऱ्या लोकांना रोखायचे कसे असा प्रश्न ग्रामपंचायतसह ग्रामस्थां समोर निर्माण झाला आहे. संसाराची मोठी स्वप्ने घेऊन जाणाऱ्या नागरिकांना, नौकरदारांना कोरोना विषाणूंमुळे महानगरातील मांडलेले संसार डोईवर घेऊन गावची वाट धरावी लागत असल्याचे चित्र  दिसत आहे. 

  सोलापूर जिल्ह्यातील वाढणारी रुग्णांची संख्या पाहता सोलापूरला किराणा सह अन्य खरेदी विक्रीसाठी ये-जा करणाऱ्यांना संक्रांत ताकिद देऊन भविष्यात कोरोना रुग्ण वाढणार नाही यासाठी खबरदारी घेण्याची गरज असून काटी येथे पोलिस कर्मचारी वाढवून मोकाट फिरणाऱ्या नागरिकांवर अंकुश ठेवावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
 
Top