तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देश लाॅकडाऊन असतांनाही लाॅकडाऊनच्या काळात तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील टोलनाक्यावरील सुरक्षा कर्मचार्यांचे वेतन संबधित ठेकेदाराने आजतागायत दिले नसल्याने व कर्मचार्यांच्या वेतनामध्ये तफावत असल्याने याबाबत भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक शिवाजी सावंत यानी कामगार राज्यमंत्री यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार केली आहे.
कोरोना या संसर्गाने देशभरात थैमान घातले असुन राज्यामध्येही कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.या पार्श्वभूमीवर संपुर्ण देश लाॅकडाऊन करण्यात आला असुन या लाॅकडाऊनच्या काळात कर्मचार्यावर उपासमारीची वेळ येऊ नये याकरीता सर्व कर्मचार्यांना घरी असतानी वेतन देण्यात यावे असे आदेश केंद्र व राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत.परंतु प्रशासनाचा आदेशाची पायमल्ली करत तामलवाडी येथील टोलनाक्यावरील ४३ सुरक्षा कर्मचार्यांचे तुळजाभवानी सर्विसेस ,तुळजापुर या ठेकेदाराने आजतागायत वेतन न दिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.तसेच शासकीय नियमाप्रमाणे या सुरक्षा कर्मचार्यांच्या कार्यालयीन तपशील व प्रत्यक्ष वेतन यामध्ये मोठी तफावत दिसुन येत आहे.याचप्रमाणे कुठल्याच कर्मचार्यांना पी एफ/वेतन पावती (पगार स्लीप) मिळत नाही व वेतन/पगार पावतीची मागणी केल्यास कर्मचार्यांना कामावरून कमी करण्याची धमकी दिली जाते याची सखोल चौकशी करावी व लाॅकडाऊन काळातील या कर्मचार्यांचा वेतन तात्काळ देण्याचे आदेश द्यावेत असे भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक शिवाजी सावंत यानी कामगार राज्यमंत्री बच्चु कडु,पालकमंत्री शंकरराव गडाख,कामगार आयुक्त मुंबई,कामगार सहआयुक्त संभाजीनगर,उपायुक्त लातुर तसेच जिल्हाधिकारी उस्मानाबाद याना ईमेलद्वारे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.या तक्रारीनंतर संबंधित ठेकेदार या सुरक्षा कर्मचार्यांचे वेतन देणार का?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.