उस्मानाबाद,दि.16 :
-शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्याची सोपी पद्धत अवलंबावी. जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करण्याची आवश्यकता आहे. कायदा आणि व्यवहार यांची सांगड घालून पीक कर्जाचे वितरण झाले पाहिजे. पीक कर्जाची पद्धत सोपी करुन शेतकऱ्यांना कमीत कमी कागदपत्रात उद्दिष्टाप्रमाणे कर्ज वाटप पूर्ण करावे. एकही शेतकरी कर्ज पुरवठ्यापासून वंचित राहणार नाही याची बँक व्यवस्थापकांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश खासदार आमराजे निंबाळकर यांनी दिले.
उस्मानाबाद तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकेची खरीप हंगाम पिक कर्ज आढावा बैठक खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दि. 15 जून, 2020 रोजी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस कळंब-उस्मानाबाद विधानसभा आमदार कैलास घाडगे-पाटील, लिड बँक मॅनेजर श्री. विजयकर, सर्व बँक मॅनेजर उपस्थित होते.
बँकांनी ऑनलाईन पद्धतीने स्टॅम्प पेपर शुल्क आकारणी करण्याचे बँकांना अधिकार दिलेले असल्याने कर्जासाठी स्टॅम्प पेपर साठी पायपीट करायला न लावता स्टॅम्प पेपरचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने बँकेतच भरून घ्यावे. तालुक्यातील कोणताही शेतकरी कर्ज पुरवठ्यापासून वंचित राहणार नाही. आपल्या बँकेकडील पूर्वी कर्ज घेतलेल्या
शेतकऱ्यांकडून फेरफार नक्कल घेऊ नये. तसेच ऊस कारखान्याचे हमी पत्र मागणी करु नये. त्याऐवजी ऊस लागण पत्र घ्यावे, असे निर्देशही खासदार श्री.निंबाळकर यांनी दिले.
तसेच मुद्रा बँकेच्या माध्यमातूनही जास्तीत जास्त कर्ज वितरण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. आपला जिल्हा प्रामुख्याने कृषी प्रधान आहे. छोटे उद्योग विकसीत होण्यासाठी मुद्रा बँकेच्या माध्यमातून कर्ज वितरण झाले पाहिजे यावरही भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.