काटी : उमाजी गायकवाड
कोरोना विषाणुचा सर्वत्र प्रादुर्भाव वाढलेला दिसून येत आहे. पुणे मुंबई चे नागरिक गावांकडे येऊ लागल्याने ग्रामीण भागात गर्दी वाढती आहे. यातच काटीतील रहिवासी तथा भिवंडीत वास्तव्यास असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याचा भिवंडीत मृत्यू झाला होता. मृत्यू हृदय विकाराने झाल्याचे सांगून येथील ग्रामपंचायतीची, कोरोना कक्षाची परवानगी न घेता विनापरवाना मृतदेह काटीत आणून त्यांच्या पार्थिवाचे काटीत अनेकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यातच मयताचा भाऊ कोरोना संशयित असल्याने त्यास तुळजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा स्वॅब घेण्यात आला आहे. त्यांचा स्वॅबचा रिपोर्ट काय येतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. मयताचे निधन हृदय विकाराने झाला की कोरोनामुळे अशा नानाविध शंका,कुशंकेने काटीकरांची अक्षरशः झोप उडाली आहे संपर्कातील नागरिकांमध्ये घबराटीची वातावरण पसरले आहे.कोरोनामुक्त असलेल्या काटी गावात अखेर कोरोनाच्या विषाणूची घुसखोरी होईल का? येथील ग्रामपंचायत प्रशासनाने मागील तीन महिन्यांपासून घेतलेल्या मेहनतीवर शेवटी पाणी पडणार का? रुग्ण पॉझिटिव्ह निघाला तर कितीजणांना क्वारंटाईन करावे लागणार असे विविध प्रश्र्न येथील ग्रामपंचायत प्रशासनाला पडले आहेत.
या पार्श्वभूमीवर काटी ग्रामपंचायतमध्ये तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रतापसिंह मरोड, आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता लोंढे, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मिरकर यांनी गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात चर्चा केली.यावेळी बोलताना तहसीलदार तांदळे म्हणाले की, तुळजापूर तालुक्यातील गावांना बाहेरून येणाऱ्या लोकांपासून धोका वाढला असून बाहेरून येणाऱ्या लोकांना कोरंटाईन करणे,त्यांची योग्य तपासणी करूनच गावात प्रवेश देणे याबाबत सुचना करून तालुक्यातील मोठे गाव असूनही येथील ग्रामपंचायत, कोरोना कक्षातील सर्व कर्मचारी, ग्रामस्थ यांनी मागील तीन महिन्यांपासून योग्य खबरदारी घेत एकही कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ दिला नाही त्यांच्या कामाचे कौतुक केले. अनावधानाने घडलेल्या या प्रसंगात प्रशासनासह सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच आदेश कोळी यांनी गर्दी टाळण्यासाठी गुरुवार दि. 18 जुन ते 20 जुन या तीन दिवसांसाठी गावातील मेडिकल दुकाने, शेतीपूरक व्यवसाय, आदी अत्यावश्यक सेवा वगळता गावात तीन दिवस जनता कर्फ्यू पुकारला असून संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. बुधवारी संशयित रुग्णाचा घराचा परिसर निर्जंतुकीकरण करून परिसरातील प्रत्त्येक कुटुंबातील सदस्यांची थर्मल स्क्रिनिंग तपासणी केल्याचे ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे व कोरोना कक्ष अधिकारी तलाठी प्रशांत गुळवे यांनी सांगून दोघांवर 188, 269, 270 कलमान्वये आदेशाचे पालन न करणे, सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणे, जिवीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग वाढविण्यास कृती करणे यानुसार तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले.
यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रतापसिंह मरोड, सरपंच आदेश कोळी, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मिरकर, आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता लोंढे, डॉ. अजित राठोड, विक्रमसिंह देशमुख, सयाजीराव देशमुख,सुजित हंगरगेकर, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, तलाठी प्रशांत गुळवे अशोक जाधव,बाळासाहेब भाले, जितेंद्र गुंड, मकरंद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.