काटी : उमाजी गायकवाड
कोरोना व्हायरसचा सर्वत्र प्रादुर्भाव वाढलेला दिसून येतो आहे. शहरातील नागरिक गावांकडे येऊ लागल्याने ग्रामीण भागात गर्दी वाढल्याची दिसून येत आहे. त्यातच काटी येथे संशयित रुग्ण आढळल्याने व त्याचा स्वॅब घेतल्याने काटीतील नागरिकांमधून घबराट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, बीडीओ प्रशांतसिंह मरोड, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मिरकर, आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता लोंढे, डॉ. अजित राठोड, सरपंच आदेश कोळी, कोरोना कक्ष अधिकारी तलाठी प्रशांत गुळवे, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच आदेश कोळी यांनी येथील गर्दी टाळण्यासाठी गुरुवार दि. 18 ते शनिवार दि. 20 जुनपर्यंत गावातील मेडिकल दुकाने, दुग्ध व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय आदी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण गावात तीन दिवस जनता कर्फ्यू पुकारला असून गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतने घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. यावेळी तहसीलदार तांदळे यांनी ग्रामपंचायतला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे म्हणाले की, तालुक्यात विनापरवाना, विना तपासणी करून मुंबई, पुणे, सोलापूर सारख्या रेडझोन असणाऱ्या शहरातून येणाऱ्या लोकांपासून धोका निर्माण झाला आहे.शहरांतून ग्रामीण भागात वर्दळ वाढली आहे. काटी हे तुळजापूर तालुक्यातील मोठे गाव आहे. तसेच काटीला परिसरातील 10 ते 12 गावांचा संपर्क असल्याने मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे दैनंदिन काटीतील सर्व व्यवसायिकाकडे मोठी गर्दी असते. ही गर्दी कमी होण्यासाठी येथील ग्रामपंचायतने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तीन दिवसाचा जनता कर्फ्यू पुकारला असून त्यास सर्व व्यवसायिकांनी, ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी गावातील सर्व पक्षांतील पदाधिकारी, ग्रामस्थ, व्यावसायिक उपस्थित होते.