तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील लहान भुयारी मार्गामध्ये पावसाचे पाणी पडत असल्याने भुयारी मार्गातील पाण्याच्या गळतीमुळे या मार्गाला धबधब्याचे स्वरूप आले असून त्यामध्ये पाणी साचत असल्याचे वृत्त तुळजापुर लाईव्हने प्रसिद्ध करताच दि.२५ रोजी संबधित अधिकारी व गुत्तेदार यानी राष्ट्रीय महामार्गावर सिमेंटच्या सहाय्याने डागडुजी करून काम केले असुन भुयारी मार्गात होणारी पावसाच्या पाण्याची गळती अखेर थांबली आहे.
सोलापूर ते धुळे हा राष्ट्रीय महामार्ग तामलवाडी गावच्या मध्यभागामधुन गेला असुन एका बाजुला सर्व शासकीय कार्यालये ,शाळा तर दुसर्या बाजुला सर्व प्रार्थनास्थळे असल्याने दोन्ही बाजुच्या नागरीकांना ये - जा करण्यासाठी गावामध्ये एक मोठा व एक लहान असे दोन भुयारी मार्ग बनवले आहेत. शिवरत्न नगर येथे लहान भुयारी मार्ग असुन महामार्गावर पडलेले पावसाचे पाणी सरळ भुयारी मार्गात पडत असल्याने भुयारी मार्गाला पाण्याची गळती लागुन भुयारी मार्गात जणू छोटा धबधबाच तयार झाला होता. हे पावसाचे पडणारे पाणी भुयारी मार्गात साचत असल्याने नागरीकांना ये -जा करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे तुळजापुर लाईव्हने प्रसिद्ध करताच राष्ट्रीय महामार्गाचे संबधित अधिकारी व गुत्तेदार यांनी दि.२५ रोजी भुयारी मार्गाच्या वरील बाजुस असणार्या नालीमध्ये सिमेंटच्या सहाय्याने डागडुजी केली आहे. या डागडुजीमुळे भुयारी मार्गात पडणारे पावसाचे पाणी अखेर थांबले असुन नागरीकांमधुन समाधान व्यक्त होताना दिसत आहे.