काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटूंबातील सोमवार दि. 20 रोजी आलेल्या रिपोर्ट मध्ये आणखी एकाच कुटुंबातील सात महिन्याच्या बाळासह चार जण पॉझिटिव्ह निघाल्याचे समोर आले असून सावरगाव येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील पहिल्या रुग्णासह त्यांच्या शेजारी राहत असलेल्या चुलत्याच्या कुटूंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता एकाच कुटुंबातील पॉझिटिव्हची संख्या पाचवर पोहचली आहे. तर काटीतील रुग्णांची संख्या सहावर पोंहचली आहे. 

 सावरगाव येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील एकाचा रिपोर्ट यापूर्वीच पॉझिटिव्ह आला आहे तर बाकीचे सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. परंतु सोमवार दि. 20 रोजी आलेल्या रिपोर्ट मध्ये शेजारील चुलत्या घरातील बाळासह चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. या चौघांपैकी चुलत्याची मुलगी व सात महिन्याचे बाळ ही सलगरा येथील रहिवासी असून काही दिवसांपासून आपल्या आईवडिलांकडे आली होती. त्यामुळे हे कनेक्शन सलगराचे आहे की सावरगावचे आहे याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.त्याच बरोबर येथील खाजगी डॉक्टरचा रिपोर्ट रविवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला आहे. खाजगी डॉक्टर कडून अनेक रुग्णांवर उपचार केल्याने उपचार केलेल्या रुग्णांची घाबरगुंडी उडाली आहे. येथील खासगी  डॉक्टरने सोलापूर येथे शनिवार दि. 18 रोजी स्वॅब दिला होता. त्यांचा काल संध्याकाळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने प्रतिबंधात्मक म्हणून येथील सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक कोरोंनटाईन झाले असून सोमवारी कोरोनाबाधितांच्या क्लोज संपर्कातील 17 पैकी  एकूण 10 जणांनी प्रायव्हेट लॅबमध्ये आपला स्वॅब दिला असून 13 जणांना स्वॅब घेण्यासाठी तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कातील लोकांनी होमकोरोंनटाईन राहण्याचे आवाहन सरपंच आदेश कोळी, कोरोना कक्ष प्रमुख तलाठी प्रशांत गुळवे, आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अजित राठोड यांनी केले आहे. तर आणखी खाजगी डॉक्टरच्या संपर्कात आलेल्यांची शोध मोहीम सुरू असल्याचे सांगितले.  

 गावकारभारीच कोरोंनटाईन असल्याने व वाढत्या रुग्णाच्या संख्येमुळे काटीकरांची धाकधूक वाढली  आहे. खबरदारी व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून येथील ग्रामपंचायतीच्या वतीने  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत  बसस्थानक ते बाजार चौक निर्जंतुकीकरण करण्यात आला असून मागील चार दिवसांचा जनता कर्फ्यु संपतो तोपर्यंत वाढत्या रुग्णाच्या पार्श्र्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय  ग्रामपंचायतीच्या वतीने पुन्हा एकदा मंगळवार ते शुक्रवार या चार दिवसांसाठी जनता कर्फ्यु पुकारण्यात आला असून जनतेने मास्क,सॅनिटायझरचा वापर करून घरीच थांबण्याचे व घाबरून न जाण्याचे आवाहन सरपंच आदेश कोळी यांनी केले आहे.
 
Top