जळकोट,दि.८ : मेघराज किलजे

 तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व वाचनालय कृषी वाचनालय संस्थेच्या वतीने खरीप हंगाम-२०२० अंतर्गत पंतप्रधान पिक विमा भरण्याचा शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यासाठी संस्थेकडून विमा भरण्याची सोय करण्यात आली आहे.

सध्या कोरोनामुळे जगभर हाहाकार माजला आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाण्याचे भाव गगनाला भिडले आहेत. शेतकरी आर्थिक अडचणीत असतानासुद्धा महागडे बियाणे घेऊन पेरणी केली आहे. त्यात सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अशा अवघड परिस्थितीत शेतकरी सापडला आहे. सध्या पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याकडून पिक विमा भरला जात आहे. श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेमार्फत कार्यालयातच सातबारा उतारा, आठ अ व पिक पेरा स्वयं घोषणा पत्र उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचा विमा भरला जाणार आहे. संस्थेमार्फत जळकोट येथील शेतकरी अण्णाराव नळगे यांच्या गट नंबर -५२५ मधील शेतीचा विमा भरून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तरी जळकोट व परिसरातील शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या शेतातील पिकाचा विमा भरणा करावा. असे आवाहन संस्थेमार्फत  करण्यात आले आहे.

यावेळी अण्णाराव नळगे यांना त्यांच्या विम्याची रक्कम भरून पावती देण्यात आली. व या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष मेघराज किलजे, संभाजीनगर  भाग शाळेचे मुख्याध्यापक धनराज रेणुके,  शेतकरी अण्णाराव नळगे, हंगरगा नळ येथील शेतकरी पेमा चव्हाण,सौ. इंदुमती पांचाळ, लक्ष्‍मण पांचाळ, सुधाकर हासुरे,बालाजी पालमपल्ले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विकास चव्हाण,सुरज अंगुले, शेतकरी बांधव उपस्थित होते.
 
Top