ताज्या घडामोडी


जळकोट : मेघराज किलजे 

महाराष्ट्रातील षटकोळी साहित्यप्रेमी समूहातर्फे सहा अक्षरी षटकोळीचे काव्यफुले या काव्यसंग्रहाचा ऑनलाइन प्रकाशन सोहळा पार पडला. या काव्यसंग्रहाचे कळंब (जि. उस्मानाबाद) मूळ रहिवासी असलेल्या व सध्या औरंगाबाद येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सुप्रसिद्ध कवयित्री, काव्यसंध्या सौ. संध्या राणी कोल्हे यांनी या काव्यसंग्रहाचे संपादन केले आहे.

महाराष्ट्रातील नामवंत कवी व कवयित्री यांचे षट कोळी साहित्यप्रेमी समूह असे मोठे व्यासपीठ आहे. या समूहा'तर्फे महाराष्ट्रातील सहा अक्षरी कविता करणाऱ्या कवी व कवियत्री यांना व्यासपीठ मिळावे. यासाठी संध्याराणी कोल्हे यांनी संपादन करून पुस्तक प्रकाशन केले आहे. या पुस्तकाची उद्घाटन कविवर्य गोपाळ फुल उंबरकर व कवयित्री वनमाला ताई पाटील , कवयित्री जागृती ताई निखारे, उस्मानाबादचे कवी हनुमंत पडवळ, कवयित्री सुचित्रा कुंचमवार, कविवर्य गुलाब राजा फुलमाळी, कवयित्री हिरकणी राजश्री बोहरा यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आला. या काव्यसंग्रहात कल्याण कल्याण येथील किरण जोगळेकर, मुंबई येथील विठ्ठल गाडी, ज्ञानेश्वर शिंदे, अश्विनी में गाने, ख्वाजा भाई बागवान, गोपाल फुल उंबरकर, वनश्री पाटील, पंडित निंबाळकर, नितीन गायके, क्रांती साहित्य विचार मंचचे सूरज अंगुले, बाळकृष्ण मालपुरी,  यांच्या शुभेच्छा संदेश आहेत. या काव्यसंग्रहात महाराष्ट्रातील सत्तर कवींच्या कविता आहेत.

या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा जवळपास तीन तास चालला. यात ज्येष्ठ कवी व गझलकार किरण जोगळेकर, ज्येष्ठ समीक्षक विठ्ठल गाडी, रचियता साहित्य मंच नागपूरचे समूह प्रशासक गोपाल फुल उंबरकर, मात्र महिमा समूह प्रशासक बाळकृष्ण मालपुरी, पाऊलखुणा साहित्य मंचचे ख्वाजा भाई बागवान, हिरकणी साहित्य गौरव प्रशासक वनमाला पाटील, मोहरली लेखणी समूह प्रकासिका अश्विनी में गाने, क्रांती साहित्य विचार मंचचे समूह प्रशासक सुरज अंगुले, ज्येष्ठ कवी पंडित निंबाळकर,  साहित्‍य ओजळ समूह प्रशासक नितीन गायके, नाते शब्दांचे साहित्य मंचचे ज्ञानेश्वर शिंदे यांनी आपले विचार मांडले. या काव्यसंग्रहाचे संपादन व प्रकाशनासाठी पुढाकार घेतलेल्या संध्याराणी कोल्हे ह्या सध्या केंद्र विहामाडवा(ता. पैठण) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आतापर्यंत महाराष्ट्रातील नामवंत संस्थेचा कवितेच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार मिळाले आहेत.

या प्रकाशन सोहळ्याचे प्रस्ताविक दत्तात्रेय धिवरे यांनी केले. या प्रकाशन सोहळ्यात महाराष्ट्रातील शेकडो कवीने सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन शिर्डी येथील सुलभा भोसले यांनी तर आभार संध्याराणी कोल्हे यांनी मानले.

 
Top