१. आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने हिंदु धर्मशास्त्रात सांगितलेला पर्याय म्हणजे ‘आपद्धर्म’ !
‘सध्या जगभरात कोरोना महामारीमुळे सर्वत्रच लोकांच्या दळणवळणावर अनेक बंधने आली आहेत. भारतातही विविध राज्यांमध्ये दळणवळण बंदी (लॉकडाऊन) आहे. काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प असला, तरी तेथे लोकांच्या घराबाहेर पडण्यावर अनेक बंधने आहेतच. यामुळे हिंदूंचे विविध सण, उत्सव आणि व्रते नेहमीप्रमाणे सामूहिकरित्या करण्यावर बंधने आली आहेत. कोरोनासारख्या आपत्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंदु धर्माने धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. यास ‘आपद्धर्म’ असे म्हणतात. ‘आपद्धर्म’ म्हणजे ‘आपदि कर्तव्यो धर्मः ।’ म्हणजे ‘आपत्काळात धर्मशास्त्राला मान्य असलेली कृती.’
या काळातच श्री गणेशचतुर्थीचे व्रत आणि गणेशोत्सव येत असल्याने संपत्कालात सांगितलेल्या पद्धतीने या वेळी उत्सव स्वरूपात, म्हणजे सामूहिक रूपाने हा उत्सव साजरा करण्यास मर्यादा आहेत. या दृष्टीने प्रस्तुत लेखात ‘सध्याच्या दृष्टीने धर्माचरण म्हणून गणेशोत्सव कसा साजरा करता येऊ शकेल ?’, याचा विचार करण्यात आला आहे. येथे महत्त्वाचे सूत्र असे की, ‘हिंदु धर्माने कोणत्या स्तरापर्यंत जाऊन मानवाचा विचार केला आहे ?’, हे यातून शिकायला मिळते. यातून हिंदु धर्माचे एकमेवाद्वितीयत्व अधोरेखित होते.
२. गणेशचतुर्थीचे व्रत कशा प्रकारे करावे ?
गणेशोत्सव हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेशचतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. या अनुषंगाने आपद्धर्म आणि धर्मशास्त्र यांची सांगड घालून देखावे, रोषणाई आदी न करता साध्या पद्धतीने पार्थिव सिद्धिविनायकाचे व्रत पुढील पद्धतीने करता येईल.
प्रत्येक वर्षी बर्याच घरांत शाडूची माती, प्लास्टर ऑफ पॅरिस आदींपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा केली जाते. या वर्षी ज्या भागात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अल्प आहे, म्हणजेच ज्या भागात दळणवळण बंदी नाही, अशा ठिकाणी नेहमीप्रमाणे गणेशमूर्ती आणून तिची पूजा करावी. (‘धर्मशास्त्रानुसार शाडूमातीची गणेशमूर्ती का असावी ?’, याविषयीचे विवरण लेखाच्या शेवटच्या सूत्रात दिले आहे.)
ज्यांना काही कारणास्तव घराबाहेर पडणेही शक्य नाही, उदा. कोरोनाच्या संसर्गामुळे आजूबाजूचा परिसर अथवा इमारत ‘प्रतिबंधात्मक क्षेत्र’ म्हणून घोषित झाले असेल, तेथील लोक ‘गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा’, यासाठी आपल्या घरातील गणेशाची मूर्ती अथवा गणेशाच्या चित्राचे षोडशोपचार पूजन करू शकतात. हे पूजन करत असतांना ‘पूजेतील ‘प्राणप्रतिष्ठा’ हा विधी करू नये’, हे लक्षात घ्यावयाचे महत्त्वाचे सूत्र आहे.
३. ज्येष्ठा गौरी व्रत कशा प्रकारे करावे ?
काही घरांमध्ये भाद्रपद शुक्ल पक्ष अष्टमीच्या दिवशी ज्येष्ठा गौरींचे पूजन केले जाते. हे काही घरांमध्ये खड्यांच्या स्वरूपात, तर काही घरांमध्ये उभे मुखवटे करून त्यांची पूजा केली जाते. कोरोनाच्या संकटामुळे ज्यांना प्रतिवर्षाप्रमाणे खड्यांच्या स्वरूपात अथवा मुखवट्यांच्या स्वरूपात त्यांची पूजा करणे शक्य नाही, ते आपल्या घरातील देवीच्या एखाद्या मूर्तीची अथवा चित्राची पूजा करू शकतात.
विशेष सूचना : गणेशमूर्ती आणतांना, तसेच तिचे विसर्जन करतांना घरातील मोजक्याच व्यक्तींनी जावे. मूर्तीचे विसर्जन करतांना आपल्या घराजवळील तलाव किंवा विहीर यांमध्ये विसर्जन करावे. या काळात गर्दी होण्याचा धोका अधिक असल्याने शासनाने कोरोनाच्या संदर्भात सांगितलेल्या मार्गदर्शक सूत्रांचे तंतोतंत पालन करणे, हे आपल्या सर्वांचेच आद्यकर्तव्य आहे.’
४. ‘गणेशमूर्ती शाडूमातीची का असावी ?’, याविषयीचा धर्मशास्त्रीय संदर्भ !
‘धर्मशास्त्रानुसार शाडूमातीची मूर्ती पूजल्यास त्याचा आध्यात्मिक स्तरावर अत्यधिक लाभ होतो’, असे हिंदूंच्या धर्मशास्त्रीय ग्रंथात सांगितले आहे.
‘धर्मसिन्धु’मध्ये ‘गणेशचतुर्थीला गणपतीची मूर्ती कशी असावी ?’, याविषयी पुढील नियम दिला आहे.
तत्र मृन्मयादिमूर्तौ प्राणप्रतिष्ठापूर्वकं विनायकं षोडशोपचारैः सम्पूज्य...। - धर्मसिन्धु, परिच्छेद २
अर्थ : या दिवशी (भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला) श्री गणेशाची माती इत्यादींपासून बनवलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापूर्वक स्थापना करून षोडशोपचार पूजा करून...
दुसर्या एका संदर्भानुसार ‘स्मृतिकौस्तुभ’ नामक धर्मग्रंथामध्ये श्रीकृष्णाने धर्मराजाला सिद्धिविनायक व्रत करण्याविषयीचा उल्लेख आहे. यात ‘मूर्ती कशी असावी ?’, याचे सविस्तर वर्णन आले आहे.
स्वशक्त्या गणनाथस्य स्वर्णरौप्यमयाकृतिम् ।
अथवा मृन्मयी कार्या वित्तशाठ्यंं न कारयेत् ॥ - स्मृतिकौस्तुभ
अर्थ : या (सिद्धिविनायकाच्या) पूजेसाठी स्वतःच्या ऐपतीप्रमाणे सोने, रूपे (चांदी) अथवा माती यांची मूर्ती बनवावी. यामध्ये कंजूषपणा करू नये.
‘यामध्ये सोने, चांदी अथवा माती यांपासूनच मूर्ती बनवावी’, असा स्पष्ट उल्लेख असल्याने यांव्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे शास्त्रानुसार अयोग्य आहे.’