उमरगा : गो.ल. कांबळे 

मनुस्मृतीच्या जुलमी जाचक अटीने महिलांना बंदी बनवले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून महिलांना स्वातंत्र्य मिळवून दिले. महिलांना समान हक्क प्राप्त व्हावेत म्हणून त्यानीं मंत्रीपदावर पाणी सोडले. खऱ्या अर्थाने डॉ. आंबेडकरांनी तमाम महिलांच्या उन्नतीसाठी परिश्रम केले असून त्यांच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकत नसल्याचे मत धम्मचरिणी अमोघनेत्री यांनी व्यक्त केले.

उमरगा, उस्मानाबाद, लातूर येथील त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्या वतीने वर्षावास कालावधीत आयोजित केलेल्या झूम अँपच्या प्रवचन मालिकेचे तिसरे पुष्प रविवार दि. १६ रोजी गुंफण्यात आले. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा व महिला सक्षमीकरण या विषयावर धम्मचरिणी अमोघनेत्री पुणे येथून बोलत होत्या. या वेळी धम्मचरिणी शांतीदा पुणे, धम्मचारी ज्ञानपलीत, धम्मचारी रत्नपालित, धम्मचारी कल्याणदस्सी, धम्मचारी विरतकुमार आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे गुरू बुद्ध, कबीर, फुले यांनी महिलांच्या उद्धारासाठी कार्य केले आहे. भगवान बुद्धांनी आपल्या संघात महिलांना समाविष्ट करून जातीय विषमतेवर प्रहार केले. संत कबीरानी समतेची शिकवण दिली. तर महात्मा फुले यांनी महिलांच्या उद्धारासाठी सावित्रीबाई फुलेंना मैदानात उतरवून महिलांना शिक्षण दिले. आपल्या गुरूंचा वारसा खंबीरपणे चालवत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या विकासासासाठी कार्य केले आहे. दिन दुबळ्या समाजातील महिलांची स्वतंत्र परिषद घेऊन त्यांचे आचार, उच्चार, विचार, राहणीमान सुधारण्यासाठी प्रेरणा दिली. चवदार तळ्याच्या सत्याग्रहात महिलांना अग्रभागी स्थान देण्यात आले. काळाराम मंदिर प्रेवेशातून सर्व मानव समान असल्याची शिकवण दिली. त्यानीं महिलांच्या शिक्षणासाठी  संविधानातून शैक्षणिक हक्क मिळवून दिले. भारतीय संसदेच्या पटलावर हिंदू स्त्रियांना समान वागणूक देणारा हिंदू कोड बिलाचा कायदा पास न झाल्याने त्यानीं संसदेत त्यागपत्र देऊन महिला सक्षमीकरण करण्यात त्याची भूमिका विशद केली आहे. कायद्याच्या चौकटीत स्त्री पुरुष समानता प्राप्त करून दिली आहे. आज महिलांना समान काम समान दाम दिला जातो. पोटगीचा दावा दाखल करता येतो. वडिलांच्या संपत्तीत मुलींना वाटा दिला जातो. महिलांना गरोदरपणात सहा महिन्यांची पगारी रजा दिली जाते ही सर्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहे, असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुद्धिस्ट सेंटरचे चेअरमन धम्मचारी ज्ञानपलीत यांनी केले. पूजेचे नेतृत्व धम्मचारी कल्याणदस्सी यांनी केले. या प्रवचनास लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद, पुणे, मुबंई येथून अनेक बौद्ध बांधव सहभागी झाले होते. धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


 
Top