नळदुर्ग, दि. 8 : पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटूंबियांना 50 लाखाचा विमा कवच मिळावा, तसेच कोरोना कालावधीत आपला जीव धोक्यात घालून काम करणा-या सर्वच पत्रकारांना शासनाकडून 50 लाखांचा विमा कवच मिळावे, अशी मागणी नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या आठवड्यात पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे उपचारादरम्यान निधन झाले. कोरोना काळात वृत्तांकन करण्याचे काम रायकर यांनी केले होते. त्यामुळे शासनाकडून पांडुंरग रायकर यांच्या कुटूंबियांना 50 लाख रुपयांच्या विम्याचा लाभ मिळावा. त्याचबरोबर राज्यातील इतर पत्रकाराना कोरोनाचा संसर्ग होण्याचा शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने तात्काळ राज्यातील सर्व पत्रकारांना 50 लाख रुपयांचा विमा कवच द्यावे, तसेच पत्रकारांना कोरोनाची लागण झाली तर त्या त्या ठिकाणच्या रुग्णालयात पत्रकारांसाठी स्वतंत्र बेडची किंवा व्हेंटिलेटरची सोय करावी, त्यासाठी काही बेड व व्हेंटिलेटर आरक्षित करुन ठेवण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांना देण्यात आले आहे. यावेळी शहर पत्रकाचे संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, तानाजी जाधव, लतीफ शेख, दादासाहेब बनसोडे, भाजपाचे शहराध्यक्ष पदमाकर घोडके, अमर भाळे आदीजण उपस्थित होते.