हंजगी : गेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात  आमनेसामने आलेले आण्णा-दादा आता पुन्हा एकदा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एकरूख उपसा सिंचन प्रकल्प अंतिम टप्यात येऊन पोहचल्याने अक्कलकोट तालुक्यातील आण्णा-दादा मध्ये श्रेयवादाची लढाई जुंपली गेली आहे.


 सोमवारी हिप्परगा तलाव येथील कारंबा पंप हाऊस सुरू झाला आहे. सध्या या पंपाद्वारे उजनी धरणातून पाणी आता हिप्परगा तलावात सोडले जात आहे. काही दिवसातच उजनीचे पाणी अक्कलकोट च्या कुरनुर धरणात येऊन पडणार आहे. यासाठी आण्णा-दादा मात्र सध्या एकरूख उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्पाला भेटी देणे, जलपूजन करणे आणि सिंचन प्रकल्पासाठी केलेले प्रयत्न नागरिकांना पटवून देण्याचे काम सध्या तालुक्‍यात जोमाने सुरू आहे. तालुक्यात आण्णा-दादांच्या श्रेयवादाच्या लढाईत नागरिक मात्र संभ्रमात पडले आहेत. तालुक्यातील नागरिक हे अंत्यत हुशार व चलाख असल्याने योग्य वेळी योग्य ते निर्णय घेण्यात ते नक्कीच तरबेज आहेत.सध्या मात्र ही श्रेयवादाची लढाई नागरिक शांतपणे पहाताना व ऐकताना दिसतात.

 एकीकडे आण्णा म्हणतात, हे जलपूजन माझ्या आयुष्यातील भाग्याचे दिवस आहेत. माझ्या हयातीत एकरुख उपसा सिंचन योजना पूर्ण झालेला पाहण्याचा योग मला आला. या साठी मी सतत बावीस वर्षे संघर्ष करत असल्याचे सांगितले. तर दादा म्हणतात, अक्कलकोट च्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. आणि सुप्रमा मंजूर करण्याचा जो निर्णय घेतला होता त्या मुळेच ही योजना पुर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे सांगितले. या आण्णा-दादांच्या मध्ये  जुंपलेल्या या  श्रेयवादाच्या लढाईत कोण मारणार बाजी ? याचा निर्णय मात्र येत्या काळात तालुक्यातील सुज्ञ नागरिकच करतील यात शंका नाही.परंतु या श्रेयवादाच्या लढाईत कोण जिंकणार ? आणि कोण हरणार या पेक्षा अक्कलकोट तालुक्यातील  एक्कावन गावाला तर दक्षिण मधील सव्वीस गावांना या सिंचन योजनेचा प्रत्यक्ष लाभ मात्र नक्कीच होणार आहे. नेहमीच अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या अक्कलकोट तालुका आता उजनीच्या पाण्याने नंदनवन होणार असल्याने सध्या  तालुकावासिया मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 
Top