नळदुर्ग, दि. 10 : गरजू नागरिकांना आधार कार्ड काढणे व आधार कार्ड अद्ययावत करणे, यासाठी शोध घेवून तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत आहे. तरीही लाभार्थ्यांच्या गर्दीमुळे तीन-तीन दिवस नंबर लागत नाही. त्याकरीता बंद असलेले आधार कार्ड केंद्र चालू करावे व शहरामध्ये आणखीन नव्याने आधार केंद्र चालू करण्यास शासनाने परवानगी देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नळदुर्ग शहराअंतर्गत असलेल्या जवळपास 72 गावांचा दैनंदिन कामकाजासाठी संपर्क येतो. मात्र याठिकाणी असलेले आधार केंद्र बंद आहे. तर येथील टपाल कार्यालयात आधार कार्ड काढण्याची व आधार कार्ड अद्ययावत करण्याची सुविधा दोन वर्षापूर्वी उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र येथील टपाल कार्यालयात आधार कार्ड काढण्याची सुविधा अद्यापही येथे उपलब्ध झाली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. दोन वर्षानंतरही आधार कार्ड केंद्र कार्यान्वित न झाल्याने शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील हजारो ग्रामस्थांची कुंचबना होत आहे. तरी वरिष्ठ पातळीवरुन याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून आधार केंद्र चालू करण्याची मागणी मनसेनी केली आहे.

निवेदनावर मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, जनहित व विधी विभागाचे तालुकाध्यक्ष मतीन बडेवाले, नळदुर्ग शहराध्यक्ष अलीम शेख, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोडके, मनविसे शहराध्यक्ष सुरज चव्हाण, सचिव भाऊराज कांबळे, शहर उपाध्यक्ष निखील येडगे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.


 
Top