उस्मानाबाद, दि. 30 : महाराष्ट्र  प्रदेश काँग्रेसच्या आदेशान्वये उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवार दि. 02 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता केंद्र सरकारच्या विरोधात छत्रपती शिवाजी चौक उस्मानाबाद येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने शेतक-च्या विरोधात व शेतक-यावर अन्यायकारक अशी तीन विधेयके संसदेत मंजूर करून घेतली आहेत. या काळ्या कायद्यामुळे शेती व शेतकरी पूर्णपणे उध्द्वस्त होणार आहे. या विधेयकाच्या विरोधात लाखो शेतकरी व शेतमजूर रस्त्यावर येवून विरोध करत असताना हे निर्दयी सरकार त्यांचा आवाज बंद करण्यासाठी लाठीमार करत आहे. हे सरकार संसदेत कोणालाही विश्‍वासात न घेता हे विधेयक शेतक-यावर लादत आहे.

हे शेतकरी विधेयक त्वरीत मागे घेण्यासाठी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी हे आंदोलन करण्यात येत आहे. सदर आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, राजेश राठोड साहेब, जिल्हा निरीक्षक कल्याणराव दळे, माजी अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, माजी अध्यक्ष विश्‍वासराव शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. सदरील आंदोलन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. धिरज पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

तरी जिल्हा काँग्रेसच्या आजी, माजी पदाधिकारी, युवक काँग्रेस, सेवा दल, एन.एस.यु.आय., मागासवर्गीय विभाग, अल्पसंख्याक विभाग, ओ.बी. सी. सेल, असंघटीत कामगार विभाग, व काँग्रेस अंतर्गत सर्व विभाग व सेल यांच्या प्रमुख पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे व शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी केले आहे. 

 
Top