उस्मानाबाद, दि. 20 :  महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवास पुढील महिन्यात प्रारंभ होणार आहे. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र महोत्सव होणार की नाही याबाबत भाविकांत संभ्रम आहे. त्या पार्श्वभूमीवर शारदीय नवरात्रोत्सवाच्या पुर्व तयारी बाबतची तातडीने बैठक घेण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन ई-मेलद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम यांनी श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना शनिवारी दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पुढील महिन्यात शारदीय नवरात्र महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे होणार आहे की नाही अशी संभ्रम अवस्था भाविकांत निर्माण झालेली आहे. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्याप्रमाणात वाढलेला असून जवळपास दहा हजाराच्या वरती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. त्यावर नियंत्रण आणण्याचे प्रशासन अटोकाट प्रयत्न करत आहे. 

मार्च ते सप्टेंबर या कालावधीत शासनाने लॉकडाउुन करून जी बंधने सर्वांना लावून दिलेली होती ती सर्व बंधने सर्वांनी स्वयंस्फूर्तीने पाळणे आवश्यक झालेली आहे. यापुढे जो काही कोरोनाचा संसर्ग होणार आहे तो आपल्या जवळच्या नातेवाईकांकडून, मित्रांकडून अथवा कार्यालयातील सहकारी यांच्यापासून होणार आहे. याचे गांभीर्य ओळखुन मंदीर प्रशासनाने होणारा नवरात्र महोत्सव रद्द करून केवळ मर्यादित भोपे पुजारी, सेवेकरी व मानक-यासह नवरात्र उत्सव साजरा करून घ्यावा, तसेच मंदिर प्रशासनाने सर्वांची आवश्यक तपासणी करूनच सक्तीने मास्क, शारिरीक अंतर व सॅनीटायझरचा वापर करून घ्यावा, ही जबाबदारी सर्वांची आहे अशी जाणीव करूनच नवरात्र महोत्सव कमीत कमी लोकांचा सहभाग कसा करता येईल ते याकडे लक्ष द्यावे, जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राज्यातील मंदीरे खुले व्हावी अशी भूमिका असली तरी देवी भक्तांना  होणा-या नवरात्र महोत्सवात कृपया प्रवेश दिला जाऊ नये, असे मनसेने निवेदनात म्हटले आहे.


 
Top