नळदुर्ग, दि. 19 : स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतरही  तुळजापुर तालुक्यातील नंदगाव ते सलगरा मड्डी या रस्त्याचे काम एकदाही झालेले नाही. त्यामुळे या भागातील शेतक-यासह ग्रामस्थांना चिखल तुडवत प्रवास करावा लागत आहे. मोठा पाउस झाल्यानंतर तर गुडघ्याभर चिखालातुन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांतुन केली जात आहे.

मुलभुत सुविधा पैकी एक असलेल्या रस्त्याच्या कामावर शासन दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करतो. मात्र नंदगाव ते सलगरा मड्डी या गावातील रहदारी असलेल्या 6 किमी रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.  नंदगाव ते सलगरा मड्डी  या दोन्ही गावाना जोडणारा रस्ता कच्चा असल्यामुळे ग्रामस्थासह शेतकऱ्यांना वाहतुकी दरम्यान अनेक अडचणीना सामना करावा लागतो. तसेच पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरत असल्याने चिखलातून वाट काढावी लागत आहे. रस्त्यावर गुडघाईतका चिखल  होत असल्याचे दिसून येत आहे. याच चिखलातुन शेतकऱ्यांना गाव गाठावे लागते. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत जिल्हा परिषद बाधकाम शाखा अभियंता याना विचारले असता ते म्हणाले की, नंदगाव ते सलगरा मड्डी या रस्त्यास क्रमांक नाही. संबंधित रस्त्याला क्रमांक मिळावा म्हणून प्रस्ताव पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले.  तर विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या समस्यांकडे वैयक्तीक लक्ष घलून या रस्त्याला क्रमांक मिळवून या रस्त्याची दुरुस्ती करुन डाबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

 
Top