सोलापूर, दि. 18 : महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त बोरामणी जि. सोलापूर येथील कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान संचलित महात्मा गांधी ग्लोबल व्हिलेजच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा.डॉ. सौ. मृणालिनी फडणवीस यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेटटी हे तर प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी ग्लोबल व्हिलेजच्या सचिवा सौ. संगीता शहा-चनशेट्टी व पत्रकार अरविंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सौ. सुजाता बादोले, सौ. किशोरी शहा, पंडित आचलरे, प्रा. अनिकेत चनशेट्टी आदीसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार अरविंद देशपांडे बोलताना म्हणाले की, कोरोना पूर्व व कोरोना उत्तर जे मानवी जीवनात बदल घडवून आणले ते फार महत्वाचे आहेत शहरी भागातील तरुण हा ग्रामीण भागात शेती करण्यास उत्सुक आहे हेच या बदलामुळे घडले आहे. म. गांधीजींनी खेड्याकडे चला असे सांगितले होते, परंतु शहराकडे स्थलांतर होणे थांबलेच नव्हते पण आता मात्र या कोरोना मुळे शहरातून पुन्हा खेड्यात येण्याचे प्रमाण वाढते आहे. अरविंद जोशी यांनी कुलगुरूंना दिलेल्या मानपत्राचे वाचन केले.
यावेळी सत्कारमूर्ती कुलगुरु सौ.मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, आज जो माझा जीवनगौरव पुरस्कार मिळाला त्यामुळे मी भारावले आहे या पुरस्काराने माझी स्फूर्ती व प्रेरणा आणखीनच वाढली आहे. कै. ब ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान यांच्या वतीने जे शैक्षणिक व सामाजिक कार्य केले जाते ते उल्लेखनीय आहे ग्रामीण भागात असे कार्य होत आहे हे खूपच कौतुकस्पद आहे. आजही जरी मी कुलगुरू पदावर काम करीत असले तरीही विद्यार्थ्यांशी मी संपर्कात असते त्यामुळेही मला एक प्रकारची ऊर्जा मिळते.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. उमाकांत चनशेट्टी म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून जे पुरस्कार दिले जातात ते त्या व्यक्तीची अपरोक्ष माहिती घेऊन,त्या व्यक्तीचे समाजातील स्थान व जनतेशी त्याची नाळ कशी जोडली आहे हे सर्व बघून त्या व्यक्तीला संस्थेच्या माध्यमातून पुरस्कार वितरित केला जातो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या आस्मा नदाफ यांनी तर सूत्रसंचालन मल्लिनाथ जळकोटे यांनी केले. तर आभार प्राचार्य विनिल जांभळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आप्पासाहेब घुगले, रुपाली बिराजदार, शिवानंद कोळी, माया व्हरटे, इंदुमती सुतार आदींनी परिश्रम घेतले.