चिवरी : राजगुरु साखरे
हिंदू पंचांगानुसार दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्याला 18 सप्टेंबर पासून प्रारंभ होत आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास, धोंडा महिना असेही म्हटले जाते. यंदा 18 सप्टेंबरपासून अधिक मास असून या कालावधीत धार्मिक कार्यक्रमाला मर्यादा असणार असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना महामारीने अख्ख्या देशाला वेढले आहे. त्यामुळे या वर्षीच्या धोंडा महिन्यात धार्मिक विधी पार पडण्यासाठी अजून तरी मंदिर बंद आहेत. तसेच धार्मिक विधींना मर्यादा असणार आहे असे दिसून येत आहे. दरम्यान अधिक मासावर कोरोनाचे सावट असल्याने नवीन जावयांना धोंडे जेवण्याचा योग येतो का नाही? याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
दर तीन वर्षांनी येणा- अधिक मासाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व असते. या महिन्याला पौराणिक कथेचे ही जोड देण्यात आली आहे. या महिन्यात मंगल कार्ये केली जात नसल्याने या महिन्याला इहलोकात निर्भत्सनेला सामोरे जावे लागले त्यामुळे त्याने वैकुंठात विष्णूकडे गाऱ्हाणे मांडले. विष्णूने त्याला गोकुळात कृष्णा कडे पाठवले, कृष्णाने या महिन्याचे नाव बदलून पुरुषोत्तम मास असे ठेवले व या महिन्यात जे लोक श्रद्धा व भक्तीने उपासना, व्रत व दान करतील त्यांना पुण्य मिळेल असे वचन दिले अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या कालावधीत श्रीविष्णूची आराधना, तीर्थस्थान देवधर्म व्रत-वैकल्ये केली जातात दानधर्म करण्यावर या महिन्यात जास्त भर दिला जातो.
तसेच या महिन्यात विशेषता नवविवाहित साठी सासरवाडीहुन भेट वस्तूंची रेलचेल सुरू होते. तर सुवर्ण पेढ्यानी जावयांना खुश करण्यासाठी चांदीचे दिवे,तबके भेटवस्तू म्हणून दिली जातात. मात्र यंदा या जावयाला धोंडे जेवणावर ही कोरोणाचे सावट आहे. त्यामुळे जावयाचा यंदा हिरमोड होणार असल्याचे दिसून येत आहे.