उमरगा : गो.ल. कांबळे
तथागत भगवान बुद्धाच्या संघात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने मानाचे स्थान देण्यात आले. स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते बुद्ध होते. त्यांच्या संघात दाखल झालेल्या अनेक स्त्रियानी बुद्धत्व प्राप्त केले होते. स्त्रियांना समान हक्क देऊन मोक्षप्राप्तीची सर्वोच्च शिकवण देणारे भगवान बुद्ध महान होते, असे मत धम्मचारिणी तारान्वीता यांनी केले.
त्रिरत बौद्ध महासंघ उमरगा उस्मानाबाद लातूरच्या वतीने वर्षावास कालावधीत रविवारी दि. १३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या धम्मप्रवचन मालिकेत झूम अँप च्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या प्रवचनात त्या बोलत होत्या. या वेळी आचार्य धम्मचारी अनोमदस्सी मुबंई, अनोमराजा, विमलधम्म,पद्मसेन,श्रद्धासेंन,करुणाध्वज,केंद्रांचे चेअरमन धम्मचारी ज्ञानपालित, प्रज्ञाजित,आदीची उपस्थिती होती. प्रारंभी पाली पूजेचे नेतृत्व धम्मचारी विरतकुमार यांनी केले.पाहुण्यांचा परिचय धम्मचारी रत्नपालित यांनी केला.
पुढे बोलताना तारान्विता म्हणाल्या की, भगवान बुद्धाचा धम्म जनमानसात पोचविण्यासाठी संघात महिला भिक्षुनी सोबतच महिला उपसिकाचे मोलाचे स्थान आहे. सर्वप्रथम भिक्षू संघात दाखल होण्याचा मान महाप्रजापती गौतमीचा असून त्यानी ५०० महिलांना सोबत घेऊन भिक्षूंनी संघ निर्माण केला. महिलांना वर्णव्यवस्था, कर्मकांड,दैववादी बनवून हीन वागणूक दिली मात्र भगवान बुद्धांनी समतेची शिकवण देऊन महिलांचा सन्मान वाढविला आहे असे त्या म्हणाल्या.
यावेळी उस्मानाबाद, लातूरसह विविध ठिकाणाहून बंधू भगीनी व केंद्रातील धम्ममित्र, महिला पुरुषांची उपस्थिती होती. धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. धम्मचारी कल्याणदस्सी यांनी तांत्रिक बाबी सांभाळून कार्यक्रम यशस्वी केला.