अणदूर, दि. 7 : तुळजापूर तालुक्यातील अणदूर व परिसरात रविवारी मध्यरात्री मेघगर्जेनेसह जोरदार वादळी पाऊस झाल्याने खरीप पिकाला जीवदान मिळाले. तर दुसरीकडे ऊसाचे उभे पीक भुईसपाट झाल्याची घटना घडली आहे.
चिवरी येथील शेतकरी संभाजी बळीराम काळजाते यांचा पाच एकर क्षेत्रावरील ऊस वादळी पावसामुळे भुईसपाट झाला आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप गळीत हंगाम सुरु नसल्याने पडलेल्या ऊसाला उंदीर लागून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
मागील पंधरा दिवसापासून पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे हातातोंडाशी आलेले खरीपातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग आदी पिके सूकून चालले होते. मात्र रात्री झालेल्या कांही शेतकरी सुखावले तर दुसरीकडे ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पंचनामा करुन त्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावे. अशी मागणी पिडीत शेतकरी संभाजी काळजाते यांनी केली आहे.