उस्मानाबाद दि 8 : गोरगरीब ,सर्वसामान्य जनता, शेतकरी ,शेतमजूर ,बेरोजगार तरुण, श्रमिक, कष्टकरी कामगार आदींना लॉकडाऊन काळात कवडीचीही मदत न देणारे महाराष्ट्र सरकार हे देशात सर्वप्रथम आले असल्याची टीका जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते अॅड रेवण भोसले यांनी केली आहे.
कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश ,तेलंगणा इत्यादी सरकारांनी लॉकडाऊनच्या काळात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार, बेरोजगार तरुण, श्रमिक इत्यादींना थेट अर्थसहाय्य व अन्नधान्याची भरघोस मदत दिली आहे. लाॅकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्येकडे शासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यातही महाराष्ट्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शासनाच्या नियोजन शून्य व ढिसाळ कारभारामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांमध्ये कसलाही समन्वय नसल्यामुळे राज्यातील सर्व विकासकामांना खीळ बसली आहे. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे पूर्णपणे धिंडवडे निघाले आहेत. एकीकडे गोरगरीब व कष्टकरी कामगारांवर उपासमारीची वेळ आली असतानाही दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीतील सर्व मंत्री व आमदारांना कंगना राणावत व रिया चक्रवर्ती यांचा प्रश्न महत्त्वाचा वाटत असल्याचे सांगत पुढे म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात ईतर राज्यात गोरगरिबांना जगण्यासाठी त्या त्या सरकारने योग्य नियोजन व खबरदारी घेतली परंतु महाराष्ट्र सरकारने मात्र गोरगरिबांना वाऱ्यावर सोडले. कर्जबाजारी व लॉककडाऊनमुळे शेतकर्यांच्या आत्महत्येत दिवसेंदिवस वाढच होत चाललेली आहे. शेतकरी, शेतमजूर ,कष्टकरी कामगार, बेरोजगार तरुण इ. या सरकारच्या शेतकरीविरोधी व जनविरोधी धोरणामुळे उध्वस्त झाला आहे. राज्यातील सर्व उद्योग धंदे लाॅक डाऊनमध्ये बंद असल्यामुळे सर्वांचे जीवन उद्ध्वस्त झाले असतानाही महाराष्ट्र सरकारने कवडीचीही मदत न दिल्यामुळे गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप अॅड. भोसले यांनी केला आहे.