काटी : उमाजी गायकवाड

उस्मानाबाद जिल्ह्यासह तालुका व परिसरातील अनेक भागात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने शेतात पूर्णपणे पाणी साचले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने उस्मानाबाद तालुक्यातील बामणी (वाडी) येथील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची अक्षरशः दाणादाण उडाली आहे. येथील शेतकरी अमर माने यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, कष्टकरी शेतकऱ्यांना शेतीची कामे करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतक-यांना त्याची रास करण्यास अडचणी येत आहेत, सोयाबीन काढणी अभावी सोयाबीन शेतात भिजत असून पावसाने यावर्षीही हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावला असल्याचे सांगितले. 

पावसाळ्याच्या सुरुवातीला जेमतेम पडलेल्या पावसाने शेतक-यांनी पेरणी केलेले पीक जोमात होती. चांगली फळधारणा होती. मात्र, खळ्यासाठी सज्ज असलेल्या शेतक-यांवर परतीच्या पावसामुळे सोयाबीन पाण्यात असुन सोयाबीनला कोंब फुटत असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावरून घेतला आहे. शेतकऱ्यांच्या नियोजनावर पाणी फेरले आहे. बामणीवाडी सह परिसरातील शेतकरी हवालदिल झाला असून  शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीनी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

 
Top