तामलवाडी  : सर्जेराव गायकवाड

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेली बंदी त्वरीत मागे घेण्याची मागणी दि. १८ रोजी तहसीलदार तुळजापुर यांच्यामार्फत  पंतप्रधान यांच्याकडे संभाजी ब्रिगेड तुळजापुर तालुका यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दि.१४ सप्टेंबर रोजी वाणीज्य मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने कांदा निर्यातबंदी करावी अशी जाचक अधिसूचना काढण्यात आली. हा दिवस संबंध भारतातील कांदा उत्पादक शेतकर्यासाठी काळा दिवस ठरला आहे. ढासळलेली अर्थव्यवस्था, कोरोना महामारी, सततचा दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकी, बोगस बियाणे, कर्जबारीपणा, नोटबंदी, जीएसटी इत्यादी संकटानी शेतकरी त्रासलेला असुन देशासह राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. देशातील शेतकरी हे  काबाडकष्ट करून उत्पन्न घेत आहेत अशातच कांद्याला कसातरी चांगला भाव मिळत असताना कांदा निर्यातबंदीच्या  या शासनाच्या अन्यायकारक निर्णायाने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्याचं मरण हेच सरकारचं धोरण हे कांद्याची निर्यातबंदी करून सरकारने सिध्द केले आहे. हे सरकार शेतकर्यांच्या जीवावर उठले आहे.याचा संभाजी ब्रिगेड जाहीर तीव्र निषेध करत असुन पंतप्रधान महोदय यानी कांदा निर्यात लवकरात लवकर चालु करावी अशी विनंतीही दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने भारत सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल तसेच देशातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत यावेळी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आपली राहील अशा आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार तुळजापुर यांच्यामार्फत पंतप्रधान महोदय याना देण्यात आले आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय नरवडे, तालुकाध्यक्ष सर्जेराव गायकवाड, उपाध्यक्ष महादेव मगर, विधानसभा अध्यक्ष निरंजन करंडे, शरद पवार, दगडू भाकरे आदी उपस्थित होते.

 
Top