तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

सन २०१९ मधील पिकविमा मंजूर होऊनही उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावातील शेतक-यांना पिकविमा मिळाला नसल्याने अनेक शेतकरी पिकविम्यापासुन वंचित राहीले. तर जिल्हा अधिक्षक कॄषी अधिकारी यांनी विमा कंपनीला कळुवनही पिकविमा मिळत नसल्याने शेतक-यांची विमा मिळवण्यासाठी धडपड चालु असल्याचे दिसून येत आहे.

प्रधानमंत्री पिकविमा योजनेंतर्गत जवळपास सर्वच शेतकरी बॅंकेमार्फत आपल्या पिकांचा विमा भरतात.नै सर्गिक, आपत्तीच्या काळामध्ये पिकांना विम्याचे संरक्षण मिळते. शेतकरी दरवर्षी कुठल्या ना कुठल्या संकटाचा सदैव सामना करतो मग तो कोरडा दुष्काळ, ढगफुटी, अतिवृष्टी,खराब बियाणे, वादळी वारे अशा अनेक संकटाचा सामना करत तो जीवन जगतोय. अशा आपत्ती काळामध्ये शेतकर्यांना थोडाफार दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा योजना आणली. जवळपास सर्वच शेतकर्यांनी खरीप हंगामाचा विमा भरला याचा लाभही शेतकर्यांना मिळाला. 

परंतु सन २०१९ या खरीप हंगामाचा भरलेला विमा मंजूर होऊनही जिल्ह्यातील अनेक शेतकरी पिकविम्यापासुन वंचित राहील्याचे दिसून येत आहे. यामध्ये उस्मानाबाद, तुळजापूर, लोहरा, उमरगा, कळंब या तालुक्यातील तडवळे, कास्ती, गंजेवाडी, चोराखळी, सकनेवाडी, केशेगाव, माडज, केरूर या गावातील शेतक-यांना विमा मिळाला नसल्याने संबंधित शेतकरी हतबल झाले आहेत.

या शेतक-यांनी जिल्हा अधिक्षक कॄषी अधिकारी  यांच्याकडे विमा मिळाला नसल्याची लेखी तक्रार केली असून जिल्हा अधिक्षक कॄषी अधिकारी यांनी संबंधित शेतकर्यांना विमा मिळाला नसल्याचे भारतीय कॄषी विमा कंपनी याना शेतक-यांच्या नाव गावाचा उल्लेख करुन पत्रव्यवहारही केला आहे. परंतु अद्यापपर्यंत काहीच उत्तर मिळाले नसल्याचे समजते. गतवर्षीचा विमा मिळाला तर नाहीच परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कांदे, ऊस, कापूस, तसेच इतरही शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 

नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार, आमदार, सत्ताधारी, विरोधक, मुख्यमंत्री नुकसान ग्रस्त भागाचे दौरे करताना दिसत आहेत. मात्र या नुकसानग्रस्त भागाच्या पहाणीसोबतच अनेक शेतकरी हे गतवर्षीच्या विम्यापासुन वंचित राहीले आहेत. याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे व विम्यापासुन वंचित राहिलेल्या शेतकर्यांना विम्याची रक्कम देण्यासाठी विमा कंपनीस आदेश देऊन शेतकर्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे.

 
Top