उस्मानाबाद, दि. 20 : गेल्या आठवड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपून काढले.सध्या सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून गोळा न करता शेतात वाळवण्यासाठी तसेच ठेवलेले असू शकते. अशा शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक भिजून नुकसान झाले असल्यास व त्या सोयाबीन पिकाचा विमा उतरविला असल्यास काढणीपश्चात नुकसान भरपाई या सदराखाली पिक विमा मिळू शकतो.
यासाठी पीक विम्यासाठी सोयाबीन अधिसूचित क्षेत्रातील शेतात सोयाबीन कापणी करून सुकवण्यासाठी पसरून ठेवलेल्या ठिकाणी कापणीपासून 14 दिवसात गारपीट,चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानीस ग्राह्य धरता येतात. यासाठी शेतकऱ्यांनी सदरची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी व कृषी विभागास देणे बंधनकारक आहे.
यामध्ये नुकसान झालेले सर्वे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळवणे ही बंधनकारक आहे.प्राप्त झालेल्या सुचनेनंतर संयुक्त समिती शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पहाणी करेल. या मध्ये विमा कंपनी प्रतिनिधी, कृषि अधिकारी व संबंधित शेतकरी यांचा समावेश असेल, पहाणीनंतर नुकसानीचा अहवाल 10 दिवसात सादर करण्यात येईल.
ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांनी गूगल प्ले स्टोअर वरून crop insurance किंवा विमा कंपनीचे Farmmitra हे अॅप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती द्यावी किंवा १८००२०९५९५९ या टोल फ्री क्रमांकावर किंवा कृषि विभागाच्या कार्यालयात अर्ज करून कळवावी, असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उमेश घाटगे यांनी केले आहे.