रत्नागिरी, दि. 29 : लोकोपयोगी प्रश्नांवर जागृत असलेल्या महाराष्ट्र समविचारी मंचच्या विद्यमाने अनेक स्थानिक प्रश्नांवर जिल्हा प्रशासनासह सबंधित मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करण्यात आला होता. त्या प्रश्नांविषयी त्या त्या शासकीय विभागाने गांभीर्याने दखल घेतली असून योग्य त्या हालचाली सुरु झाल्या असल्याची माहिती समविचारीचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर यांनी दिली.
समविचारीचे प्रमुख बाबासाहेब ढोल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वस्वी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर,महिलाध्यक्षा जान्हवी कुलकर्णी युवा प्रमुख निलेश आखाडे,तालुकाध्यक्ष डॉ सुजय लेले,महिलाध्यक्षा साधना भावे आदींनी जिल्ह्यातील अनेक भेडसावणा-या समस्या शासन पातळीवर मांडल्या होत्या.लक्षवेधी उपोषणही केले होते.जिल्हा प्रशासनासह सर्व पातळीवर या मागण्यांची चौकशी तर कार्यवाही करण्याचे नमूद करण्यात आले आहे.
यातील प्रमुख दखल घेतलेल्या समस्यांमध्ये रत्नागिरी बसस्थानक बांधकामाच्या वेळकाढूपणाबद्दल चौकशीचे आदेश प्रारीत झाले असून विभागीय वाहतूक नियंत्रकांना कामाच्या त्वरित अंमलबजावणीसाठी कळविण्यात आले आहे.सिव्हिल स्क्रिनिंग ओपीडी विभागात कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येविषयी अपर सचिव मुंबई यांना दखल घेण्याचे सांगण्यात आले आहे.दापोली आडे येथील दूरध्वनी यंत्रणेचा उडालेला बोजवारा प्रश्नी भारत संचार निगमला तातडीने कार्यवाही करण्याचे कळविण्यात आले असून जिल्ह्यातील भातपीक आणि निकृष्ट भात बियाणे वाटप प्रकरणी सखोल चौकशी आणि नुकसानी पंचनामे हाती घेण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.इतर प्रश्नी समविचारी पदाधिकारी बैठक घेण्यात येणार असून लवकरच प्रशासन समयोचित कार्यवाही करेल असा विश्वास देण्यात आला आहे.
दरम्यान समविचारीने विविध प्रश्नांवर सनदशील मार्गाने आंदोलने करण्याचा इशारा दिला होता.सुचविलेल्या लोकोपयोगी कामांना चालना न दिल्यास आंदोलन अटळ असेल असे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर यांनी स्पष्ट केले आहे.या प्रश्नी समविचारीमंचने पाठपुरावा केल्याने सामान्य जनतेत आनंद व्यक्त केला जात आहे.