जळकोट, दि. २९ : तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील संभाजी नगर भागात राहणाऱ्या महिला शेतकऱ्यांनी सततच्या नापिकीला व खासगी कर्जाला वैतागून राहत्या घरातील आडुला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २९ रोजी मध्यरात्री घडली.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, जळकोट येथील संभाजी नगर भागात राहणाऱ्या सौ. कलावती भगवान कागे यांची आलियाबाद शिवारात१ हेक्टर ६२ आर शेती जमीन आहे. शेती सतत नापिकी होत असल्याने व या वर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन हे पीक अतिवृष्टीने वाहून गेल्याने त्या नैराश्य ग्रस्त झाल्या होत्या. शेतात सतत नापिकी होत आल्याने व खाजगी सावकाराचे कर्ज वाढत चालल्याने वैतागून कलावती भगवान कागे(वय-६०) या महिला शेतकऱ्यांनी स्वतःच्या राहत्या घरात दि. 29 रोजी च्या मध्यरात्री दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सततच्या नापिकी व खाजगी कर्जाला कंटाळून एका महिला शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. सार्वजनिक स्मशानभूमीत दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबाच्या कर्त्या महिला असल्याने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
या घटनेचा पंचनामा जळकोट सज्जाचे तलाठी तात्यासाहेब रुपनवर यांनी केला असून, या पंचनाम्यावर गणेश सोनटक्के,मेघराज किलजे, राजेंद्र यादगौडा, गजेंद्र कदम , पुंडलिक भोगे यांच्या स्वाक्षर्या आहेत. त्यांच्या पश्चात पती,२ मुले व २मुली आहेत.