चिवरी : राजगुरू साखरे
वातावरणातील बदलामुळे तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरातील गावामध्ये पहाटेच्यावेळी मोठ्या प्रमाणात धुके पडत असून, दिवसभर ढगाळ वातावरण राहत आहे. या धुक्यामुळे तुरीला फुलगळतीचा व अळ्यांचा प्रादुर्भावाचा फटका बसत आहे.
परतीच्या पावसामुळे तालुक्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पिके खराब झाली. आता शेतकऱ्यांच्या आशा तुरीवर उरल्या होत्या. मात्र मागील तीन चार दिवसापासून पहाटेच्या वेळी धुके पडू लागल्याने तुरीची फुले गळून पडत आहेत.
सध्या तूर पीक फुलोऱ्यात आहे. तर काही ठिकाणी तुरीच्या पानावर अळ्यांनी हल्ला चढवल्याचे दिसून येत आहे. परतीच्या पावसामुळे जमिनीत साचलेल्या पाण्यामुळे तुरीची फुल गळती होत आहे. काही माळरान भागातील जमिनीमध्ये पाणी साचले नाही. त्यामुळे तेथील पीक चांगली आहे. मात्र अळीच्या प्रादुर्भावाने संकट निर्माण झाले आहे. सद्यस्थिती तुरीचे पीक फुल व कळी येण्याच्या अवस्थेत आहे.
मागील तीन चार दिवसापासून पडत असलेल्या जाळ व पान धुक्याच्या प्रादुर्भावामुळे अतिवृष्टी मध्ये सापडलेले तूर पीक पुन्हा वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.