उस्मानाबाद दि 17 : दरमहा 300 युनिट्स च्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची लॉकडाउन काळातील सहा महिन्यांची संपूर्ण वीज बिल माफ करण्यात यावीत असे मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
देशात आणि राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला त्याला आता 7 महिने होत आले आहेत .वास्तविक या काळात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन देशातील सर्व गरीब जनतेला स्वतः अथवा राज्य सरकार मार्फत थेट मदत करणे आवश्यक होते. सुरुवातीला दिलेली अल्पमुदत, रेशन व ईपीएफ व्यतिरिक्त केंद्र सरकारने नंतर कोणतीही थेट मदत दिली नाही. या जागतिक महामारीचे स्वरूप व परिणाम ध्यानी घेता जगातील अन्य अनेक देशांच्या तुलनेने केंद्र सरकारने केलेली मदत नगण्य आहे. एवढेच नाही तर राज्य शासनानेही काही मदत केली नाही .तसेच राज्य शासनांना त्यांच्या हक्काचे पैसेही दिले जात नाहीत. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती खराब आहे ,असे असले तरीही महाराष्ट्र सरकारला आपल्या राज्यातील जनतेची जबाबदारी झटकता येणार नाही. गेले 6.5 महिने रोजी रोटी बंद असल्याने उदरनिर्वाह करताना गरीब ,कष्टकरी, कनिष्ठ मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीय या सर्वांचीच दमछाक झाली आहे. त्यामुळेच जून अखेरीस तीन महिन्यांची वीज देयके येताच जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला .ही बिले भरताच येणार नाहीत, अशीच अवस्था राज्यातील बहुतांशी ग्राहकांची आहे. त्यामुळे गेले तीन महिने सातत्याने वीज बिल माफी साठी आंदोलने सुरू आहेत . राज्य सरकारनेही सुरुवातीला 25% सवलत देऊ असे जाहीर केले. तथापि नंतर गेल्या दोन महिन्यात काहीच घडले नाही .लॉक डाऊन आता बऱ्याच अंशी उठला असला तरीही अजूनही अनेकांची रोजीरोटी सुरू झालेली नाही .गाठीशी असलेला थोडा बहुत पैसाही आता संपलेला आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात उपासमारीची भीती डोकावू लागली आहे .अशा परिस्थितीत राज्य सरकारने पुढाकार घेऊन निर्णय घेणे व राज्यातील जनतेला दिलासा देणे आवश्यक आहे.
देशातील केरळ, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यातील शासनांनी संपूर्ण लॉकडाउन कालावधीसाठी 50% टक्के वीज बिल माफीचा निर्णय घेऊन जनतेला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. ुरोगामी व प्रगत म्हणविणार्या महाराष्ट्र सरकारने या पार्श्वभूमीवर आता तातडीने निर्णय घेणे अत्यावश्यक आहे. तीन महिने होऊनही कोणताही निर्णय न झाल्याने राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ही सर्व वस्तुस्थिती व राज्यातील असाधारण परिस्थिती ध्यानी घेऊन दरमहा 300 युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची लाॅकडाऊन कालावधीतील सर्व सहा महिन्यांची वीज देयके पूर्णपणे माफ करण्यात यावीत अशी मागणी ॲड भोसले यांनी केली आहे.
तसेच राज्यात परतीच्या पावसाने मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाला आहे. कोकणात, मराठवाड्यात सोयाबीन ,विदर्भात सोयाबीन ,कपाशी, ज्वारी, धान अशा पिकांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अद्यापर्यंत केले जात नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे शेतकरी या अन्नदात्याला वाऱ्यावर सोडून दिल्यासारखे परिस्थिती निर्माण झाली आहे .त्यामुळे अतिवृष्टी व पावसामुळे झालेल्या पिकाचे पंचनामे तात्काळ करण्यात यावेत तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्याला सरसकट एकरी 50 हजार रुपये मदत देण्यात यावी तसेच महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्यात येऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना युद्धपातळीवर सर्व स्तरावर व सर्व प्रकारची मदत देण्याची मागणीही ॲड भोसले यांनी आपल्या निवेदनात केली आहे.