नळदुर्ग, दि. 28 : शेतक-यांच्या उन्नतीकरिता आर्थिक, सामाजिक, पर्यावरण या तीन तत्वावर काम करीत असून शेतकरी आत्महत्या मुक्त व प्रदुषण मुक्त तुळजापूर तालुका करण्याचा उदिष्ट आहे. त्याचबरोबर हाताला काम देण्यासाठी मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती, शेतक-यांना स्वावलंबी करण्यासाठी अधिक भर दिला जाणार असल्याचे मत धरणे बायोफ्युल प्रा.लि. व मीरा क्लीनफ्युल लि. मुबंई यांच्या संयुक्त विदयमाने नळदुर्ग या भागात होणा-या नॅचरल गॅस निर्मिती प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक सचिन धरणे यानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रेरणा घेवून व डॉ. शाम शिवाजी घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग भागात इंधन निर्मिती करीता बायो-सीएनजी निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. कार्यक्षेत्र संपूर्ण तुळजापूर तालुका राहणार आहे. तालुक्यातील 40 गावांना भेटी देवून कामास सुरुवात केली आहे. आतापर्यंत जवळपास 900 शेतकरी सभासद झाले आहेत. सभासद फीस प्रत्येकी 500 असून प्रत्येकी सदस्याला 5 हजार रुपये दरमहा उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून शेतक-यांच्या नापीक, पडीक जमिनीवर बायोमास शेती हा प्राथमिक स्त्रोत आहे. त्यातून उत्पन्न वाढते आणि जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली येईल. रासायनिक शेतीतून सेंद्रीय शेतीमध्ये बदल करण्यास मदत करणार, त्यामुळे उत्पन्न वाढीस मदत होईल. सेंद्रीय खताच्या वापरामुळे शेतीची सुपिकता वाढण्यास मदत होणार आहे. ज्यांची जमिन नाही त्यांना पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन व्यावसायिक विकास योजनेतून उत्पन्न मिळवून देण्यास मदत करणार.
येथे निर्मिती होणारे इंधन हे सध्या प्रचलित असलेल्या खनिज इंधनाला पूर्णपणे पर्याय म्हणून ग्राहकांना पुरविणार आहे. या प्रकल्पाची शंभर टन क्षमता, प्रतिदिन एक लाख किलोग्रॅम सीएनजी/पीएनजी याप्रमाणे आहे. शेतक-यांनी गजराज गवताची लागवड करावी, वर्षातुन तीनवेळा कापणी होणार आहे. प्रारंभी एक हेक्टरसाठी गवताचे बेणे देण्यात येईल.
या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतक-यांची आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न करुन आरोग्य, शिक्षण, रोजगार यासह विविध विषयाबाबत प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात प्रयत्न केले जातील, असेही सचिन धरणे यांना बोलताना सांगितले.
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, उस्मानाबाद जि.प. चे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्या हस्ते विजयादशमीच्या शुभ मुर्हूतावर कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक बसवराज धरणे, विनायक अहंकारी, शहबाज काझी, माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण, शब्बीर सावकार, नवाज काझी यांच्यासह एमसीएसलचे संजय खांबरे, डॉ. यशपाल भिंगे, माणिकराव लोगावे आदीसह प्रतिष्ठित मान्यवर, व्यापारी उपस्थित होते.