तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील रोहित्र जळाल्याने गेली तीन दिवसांपासून गाव अंधारात असुन गावाला गेली महिनाभरापासून वायरमनच नसल्याने गावचा महाविरणचा कारभार सध्या रामभरोसे चालला आहे.
तामलवाडी येथील रोहित्र जळाल्याने गावात गेली तीन दिवसांपासून वीज नसल्याने गावातील नागरीकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. गावामध्ये तीन दिवस वीज नसल्याने नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच बॅंक ऑफ महाराष्ट्रचा संपूर्ण व्यवहार ठप्प झाला असून तामलवाडी पोलीस ठाण्यातील सर्व कामे खोळंबली आहेत.
सध्या नवरात्रीचा उत्सव चालू असुन या उत्सव कालावधीत वीज नसल्याने देवीची मुर्ती अंधारात राहत असुन देवीची पूजा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.दि. २१ रोजी दुपारी रोहित्र बसवुन रात्री ११ वाजेच्या दरम्यान वीज चालू करण्यात आली परंतु महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे अवघ्या चार तासातच रोहीत्र जळाला. गावाला गेली महिनाभरापासून कायमस्वरूपी वायरमनच नसल्याने महावितरणचा कारभार सध्या झीरो वायरमनच्या रामभरोस्यावर चालला आहे. महावितरणचे जिल्हा अधिकक्षक अभीयंता यानी लक्ष घालून तामलवाडी येथे महावितरणचा चाललेला भोंगळ कारभाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे.
महावितरणचे अधिकारी कावरे यांचे दुर्लक्ष
दि. २१ रोजी बसवलेला रोहित्र अवघ्या चारच तासामध्ये जळाल्याने गाव पून्हा अंधाराच्या खाईत लोटल्याने गावातील नागरीकांधुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच भर म्हणून महिनाभरापासून कायमस्वरूपी वायरमनच नाही याबाबत महावितरणचे अधिकारी कावरे याना दुरध्वनी वरून विचारले असता उंच आवाजामध्ये वायरमन नाही काय असे सांगून फोन बंद केला .वायरमन नाही, रोहित्र जळाला अशा अनेक अडचणी असताना महावितरणचे अधिकारी कावरे यांचे याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.