तुळजापूर : कुमार नाईकवाडी
अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यासह तुळजापुर तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकरी, तसेच ज्यांच्या घरांची पडझड झालेल्या अशा कुटूंबांना भरपाई अनुदान मंजुर करण्यात यावा, अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यासह तुळजापुर तालुक्यात दि. 13 व दि. 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे 84 पशुधनास जलसमाधी मिळाली आहे. दोन व्यक्त्तींचा वीज पडून मृत्यू झाला. तर 101 कुटूंबाचा निवारा ढासळून अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्यासह ते बेघर झाले आहेत. अतिवृष्टीमुळे माती नाला व बांधबंदिस्ती फुटल्यामुळे हजारो एकर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानी बरोबर शेतजमिनी वरील माती केवळ दगड गोटे उरले आहेत.
तुळजापुर तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, ऊस, तूर, मका, कांदा, द्राक्ष बाग, दाळींब तसेच भाजीपाला व अन्य पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच कोरोनामुळे आधीच हतबल झालेल्या शेतकरी व शेतमजुरांना काम नाही व त्यातच या अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने त्यांचे अतोनात हाल होत आहेत. तरी त्यांना तात्काळ आर्थिक मदत व निवा-यांची व्यवस्था होणे आवश्यक आहे. पाझर तलाव, माती नाले, सिमेंट बंधारे, बांधबंदधिस्ती इत्यादी अतिवृष्टीमुळे फुटून शेतक-यांच्या शेतजमिनी बरोबरच उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतक-यांना तात्काळ पंचनामे करुन मदत देण्यात यावी व फुटलेले पाझर तलाव मातीनाले इत्यादी दुरुस्त करण्यासाठी संबंधित यंत्रणेस तातडीने निधी उपलब्ध करुन कामे करण्यास सुचित करण्यात यावे, असे माजी मंत्री चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.
तुळजापुर तालुक्यात झालेल्या या अतिवृष्टीमुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालेले असून या आसमानी संकटाने शेतक-यांना मोठ्या संकटात लोटलेले आहे. सर्व बाबींचा विचार करुन शासन स्तरावरुन नुकसाग्रस्त भागातील सर्व शेतक-यांना नुकसान भरपाई अनुदान मंजुर करण्यासाठी प्रयत्न करुन दिलासा द्यावा, अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.