नळदुर्ग : एस.के. गायकवाड 

कोजागिरी पौर्णिमेची सांजवेळ..... निळाईच्या पार असलेले स्वच्छ सुंदर असे निरभ्र आकाश...! पौर्णिमेच्या रात्रीच्या सौंदर्याची साक्ष देणारं लक्षवेधी शरदाचं चांदणं.... वातावरणात साठलेली ताजी हवा अन् बोचरी थंडी... नभात दाटलेल्या चंद्रतारा आणि  त्या लखलखत्या चंद्रप्रकाशाच्या साक्षीने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त नळदुर्ग ता. तुळजापूर येथील ऋणानुबंध व सखी मंचच्यावतीने रंगलेली काव्य मैफिल मनात साठवून ठेवण्याजोगी ठरली... !

कोजागिरी आणि शरद ऋतूचं निरंतर नातं सांगणारा कोजागिरी पौर्णिमेचा आल्हादायक क्षण म्हणजे आनंदाची व उल्हासाची नवी पर्वणीच असते. धार्मिक, सांस्कृतिक व नैसर्गिकदृष्टया  मानवी जीवनाचं निसर्गाशी असलेलं अव्यक्त  समीकरण अजूनही मनात घट्ट रुजलेलं असतं .  या काळात तिन्ही ऋतूंचा झालेला त्रिवेणी संगम हे शरद ऋतूचं खास वैशिष्ट्य .आपल्या अनाहत सौंदर्याच्या अगणित आठवणी देऊन लुभावणारा हा शरद ऋतूतील स्वाती नक्षत्रात पडणारा पाऊस ..आणि या पावसाच्या थेंबाचे जसे मोती शिंपल्यामध्ये तयार व्हावेत तसेच लखलखणारे चांदण मोती पौर्णिमेच्या रात्रीला आभाळभर पसरतात आणि सुरू होते एक नखशिकखांत लखलख .. ! तेव्हा सर्वाना खुणावते ती कोजागिरी पौर्णिमेची चांदरात.. अशा चांदराती चांदण्याच्या शीतल सहवासात नळदुर्ग येथील ऋणानुबंध व सखीमंच परिवाराच्यावतीने विविधांगी कवितांचे सादरीकरण,  मनोरंजनाचे खेळ आणि मनमुराद गप्पानी ठासून भरलेला "ऋणानुबंध नात्यांचे" या खास कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आलं होतं.

व्यंकटेश नगर येथील विनय परळकर यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विविध मनोरंजनाचे खेळ स्पर्धा,उखाणे, आणि मनमुराद गप्पा , सदाबहार कवितांचे सादरीकरण, हास्याचे फवारे उडणारे लज्जतदार विनोदी किस्से आणि मनात साठलेल्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले. जीवनाचा निखळ आनंद आणि कोजगिरीची विविध रूपे उभी करणाऱ्या या कार्यक्रमात एकिकडे सदाबहार काव्यमैफिल तर दुसरीकडे चंद्राची चंद्रकिरण पडलेल्या आरोग्यदायी दुधाचा आस्वाद यातुन साधलेला दुग्धशर्करा योग यामुळे या कार्यक्रमात आणखीनच रंगत वाढली होती. 

या कार्यक्रमात सखी मंचच्या सौ. सुप्रियाताई परळकर डॉ. संतोष पवार, भैरवनाथ कानडे, सौ. हेमलता काटकर , सौ.प्रतिभा पवार,दयानंद जाधव, प्रा. अनिल दबडे डॉ. नागेंद्र आरबळे, शिवाप्पा जवळगे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी अनिकेत यादव, विनय परळकर, डॉ. आनंद काटकर, मुख्याध्यापिका महदेवी जत्ते ,डॉ.  डि.आर. कदम, सौ.उमा जाधव , सौ. निलावती गायकवाड, सौ. पतगे,सौ.माने , सौ. छाया कदम, श्वेता परळकर आदींसह उपस्थितांनी आपल्या कविता, विनोदी किस्से, गाणी, व मनोरंजाच्या खेळात सहभाग नोंदविला. या प्रसंगी उस्मानाबाद जिल्हा उद्योजगता विकास सल्लागार समितीवर भैरवनाथ कानडे यांची निवड झाल्याबद्दल येथील  ऋनांनुबंध व सखीमंच  वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

 या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संतोष पवार यांनी तर आभार प्रदर्शन भैरवनाथ कानडे यांनी केले. या कार्यकमास काव्यप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

 
Top