जळकोट : मेघराज किलजे
षटकोळी साहित्यप्रेमी समूहाने कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधत षटकोळी गणेशोत्सव ई -काव्य संग्रहाचे प्रकाशन या दुसऱ्या षटकोळी ई -प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन दि.३० रोजी रात्री आपल्या व्हॉट्सअप समुहात सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात ऑनलाईन पद्धतीने पार पाडला.
सदर प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी समूहातील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कवी, कवयित्रीनी षटकोळी समुहातील गणेशोत्सवा दरम्यान दैनंदिन दहा दिवसातील उपक्रमातील सहभागी कवितांची एकत्रित गुंफण व्हावी. या उद्देशाने हा ई काव्य संग्रह तयार केलेला आहे. दर्जेदार व सुंदर अशा गणेशावरील कवितांचा ई काव्यसंग्रह तयार झालेला असून कवितांचे संकलन व संपादक कवयित्री संध्याराणी कोल्हे (कळंब, जि.उस्मानाबाद) यांनी काम पाहिले. सदर ई काव्य संग्रहाला अधिक आकर्षक आणि सुबकता आणण्याचे काम ग्राफिक्सकार कवी ज्ञानेश्वर शिंदे,कोपरगाव यांच्या कार्य शैलीतून झालेले आहे.
कार्यक्रमादरम्यान सर्वप्रथम समुहात उपस्थित सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची थोडक्यात रुपरेषा समुहप्रशासक व कवयित्री कोल्हे यांनी सांगितली. त्यांनतर सुत्रसंचालन कवयित्री सुलभा भोसले,शिर्डी यांनी अध्यक्ष निवडीची सूचना मांडून त्यास अनुमोदन कवयित्री संध्याराणी कोल्हे यांनी दिले. अध्यक्ष म्हणून जेष्ठ कवी व प्राध्यापक श्री.दत्तात्रय धिवरे,धुळे यांची निवड केली. दिप पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. स्वागत गीताद्वारे सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
यानंतर जेष्ठ कवयित्री,समाजसेविका श्रीम.वनमाला पाटील,जालना यांनी कार्यक्रमाचे थोडक्यात प्रास्ताविक सादर केले. यानंतर मुखपृष्ठाचे अनावरण करून संपादकीय मनोगत पेज सर्वांसमोर सादर करण्यात आले. तद्नंतर जेष्ठ कवी,प्राध्यापक दत्तात्रय यांनी आपले अध्यक्षीय मनोगत मांडून संपूर्ण काव्यसंग्रह पीडीएफ स्वरूपात प्रकाशित करून वाचकांच्या हाती सुपूर्त केला,कवयित्री सुरला भोसले,शिर्डी यांनी सूत्रसंचालन केले तर कवयित्री व समुहप्रशासक संध्याराणी कोल्हे यांनी सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता केली. सर्व सदस्य प्रत्यक्षात प्रकाशन सोहळ्याचा आनंद घेत असल्याचे अनुभवत असल्याचे प्रतिक्रियेत सर्वांनी व्यक्त केले.
श्री गणेश या एकाच विषयावरील व विविध काव्य प्रकारांतील विविध कवितांचे संकलन व्हावे या उदात्त हेतूने आपण या ई प्रातिनिधिक काव्यसंग्रह निर्मितीची संकल्पना राबविल्याचे समूह प्रमुख व संपादक कवयित्री संध्याराणी कोल्हे यांनी आपल्या मनोगतात सांगितले आहे. सर्वांच्या उपस्थितीने हा प्रकाशन सोहळा आनंदी व उत्साही वातावरणामध्ये पार पडला.