तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील पर्यायी रस्त्याच्या बाजूला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे संबंधित अधिकारी, गुत्तेदार यांनी गटारीचे व्यवस्था न केल्याने पाणी रस्त्यावर येत असुन ग्रामस्थांमधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सोलापूर ते धुळे हा राष्ट्रीय राजमार्ग (नं ५२) सुरतगाव येथुन गेला आहे. पुर्वीचा रस्ता गावाच्या मध्यभागातुन वळणाचा रस्ता असल्याने ते वळण कमी करून राष्ट्रीय राजमार्ग थोडासा बाहेरून केला गेला व गावामध्ये उड्डाण पुल उभारण्यात आला आहे.उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूंना पर्यायी रस्ता आवश्यक असताना तो बनवलाच नव्हता गावच्या पूर्वेकडील बाजूच्या पर्यायी रस्त्यासाठी आंदोलन करून रस्ता करवून घ्यावा लागला परंतु पश्चिम बाजुचा पर्यायी रस्ता अद्यापपर्यंत बनवलेला नाही.
पुर्वीचा जुना रस्ता आहे असाच राहील्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पर्यायी रस्ता बनवला नसावा किंवा तो बनवला असे दाखवण्यात आले असावे असे स्थानिक नागरीकांनी सांगितले पर्यायी रस्ता बनवत असताना दोन्ही बाजूंनी गटारी करणे आवश्यक असताना पश्चिमेकडील बाजुची गटार बनवलीच नाही. पर्यायी रस्ता आयताच मिळाला असुन बाजुची गटार बनवली नसल्याने सुरतगाव ग्रामपंचायतीने महामार्ग प्राधिकरणचे संबंधित अधिकारी यांच्याशी बोलणे झाले असल्याचे सांगितले. परंतु त्या पर्यायी रस्त्याच्या बाजुच्या गटारीचा विषय हा स्थानिक बांधकाम विभागाकडे येत असल्याचे सांगण्यात आल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.
संबंधित पर्यायी रस्ता हा गावामधुनच सावरगाव,काटी, वैराग या गावाना जात असुन या पर्यायी रस्त्याच्या बाजूला गटारीची व्यवस्था नसल्याने पाणी रस्त्यावर येत आहे. याचा वाहनचालक, नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकारी यांनी सुरतगाव येथील पर्यायी रस्त्याच्या बाजूच्या गटारीची कामे तात्काळ करावी अन्यथा सुरतगाव ग्रामस्थ व शिवसेवक समिती यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे शिवसेवक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांनी बोलताना सांगितले आहे.