मुंबई, दि. 6 : देशातील विद्यापीठांसह महाविद्यालये सुरू करण्यासाठी युजीसीने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र अद्याप राज्यात महाविद्यालये कोणताही निर्णय झालेला असून दिवाळीनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व कुलुगुरुसोबत बैठकीनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज बोलताना सांगितले.
विद्यापीठ, महाविद्यालयांमधील कोविड परिस्थिती लक्षात घेता यूजीसीनं काही सूचना केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षा दृष्टिकोनातून विचार करून निर्णय घेऊ. तसेच युजीसीने गाईडलाइन्स दिल्या त्यांना आधी धन्यवाद देतो. कारण त्यांनी त्यात सांगितले की राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घ्यावा. युजीसीने पत्र दिलंय, त्यावर कुलगुरूंसोबत चर्चा केली आहे. आता मुख्यमंत्र्यांसोबत सगळ्या कुलगुरूंची बैठक दिवाळीनंतर घेणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व महाविद्यालयात पदविका आणि पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशात राज्यातील आजी/ माजी सैनिकांच्या पाल्यांना 5 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.
तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे बाकी आहे अथवा अन्य कारणांमुळे परीक्षा देऊ शकले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांच्या उर्वरित परीक्षा या दिवाळीपूर्वी घेण्यात याव्यात. कोणत्याही विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्रावर कोविड -19 चा उल्लेख राहणार नाही. विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे त्यांचे पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, असंही सामंत यांनी यावेळी सांगितले.