चिवरी : राजगुरू साखरे

तुळजापूर तालुक्यातील चिवरी व परिसरात सध्या बळीराजा रब्बी हंगामाची मशागत करण्यात व्यस्त आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. तालुक्यातील बागायत क्षेत्र धोक्यात येऊन उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

 हवामान खात्याच्या भाकितानुसार उशिरा पावसाने सुरुवात केली खरी, परंतु या वर्षी एकंदरीत सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाल्याने निसर्गाने अनेक वर्षाची रेकॉर्ड तोडले आहेत. तुळजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने तरी खरीप हंगाम वाया घालवला असून सध्या पावसाने उघडीप  दिल्याने रब्बी हंगामाच्या तयारीत शेतकरी राबताना दिसत आहे. 

खरीप हंगाम वाया गेल्याने हंगामातील पाऊस लांबला की, रब्बी हंगाम पदरात पडतो की नाही याची शंका निर्माण झाली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून पाऊस पूर्णपणे उघडला असेल थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण तालुक्यातील बळीराजा रब्बी हंगाम चांगले उत्पादन घेण्यासाठी मशागती करण्यात व्यस्त आहे.

 रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी मोठ्या प्रमाणात केली जाते. तालुक्यातील 70 टक्के क्षेत्रावर गहू ज्वारी व हरभऱ्याची पेरणी केली जाते. खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट होऊन शेतकर्याची आर्थिक कंबरडे मोडले. त्याची भरपाई रब्बी हंगामात होईल अशी अपेक्षा बाळगून शेतकरी रब्बी हंगामाच्या मशागतीच्या तयारीला लागला असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.

 
Top