काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी ते वाणेवाडी, दारफळला जोडणाऱ्या रस्त्याला भगदाड पडल्या ने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे काटी पासून दोन किलो मीटरच्या अंतरावर वाणेवाडी रस्त्याच्या पुलाजवळील रस्त्याच्या उजव्या बाजूला रस्ता खचल्याने व साईडपट्टी उखडून पडल्याने मोठा खड्डा पडला आहे.
सोलापूरला जाणे-येणेसाठी वाहनचालक याच मार्गाचा अवलंब करतात. तसेच रात्रंदिवस ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर सुध्दा याच मार्गाने जातात. डांबरी रस्त्यालगतच साईडपट्ट्या उखडून खड्डा पडल्याने व पुलावर संरक्षण कठडा नसल्याने रात्रीच्या वेळी वाहन थेट खड्यात कोसळून जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता आहे. सदर मार्गाने मोठ्या वाहनांसह, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, चार चाकी व दुचाकी तसेच ग्रामस्थ प्रवास करतात. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ता साईड पट्टी काही दिवसांपूर्वी खचून रस्ता धोकादायक झाला आहे.
विशेष म्हणजे धोकादायक ठिकाणी वधानता फलकही लावण्यात आला नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी अनोळखी वाहन चालकास रस्त्याचा अंदाज न आल्यास अपघाताची शक्यता आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेण्याची मागणी वाहन चालकांमधून होत आहे.