चिवरी : राजगुरु साखरे
यंदाच्या वर्षात चांगला पाऊस पडल्याने शेती शिवारातील आंब्याच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर मोहर आला असून आंब्याची झाडी मोहरांनी बहरल्याने शिवारात सर्वत्र सुगंध दरवळत आहे.
डिसेंबर ते जानेवारी महिन्यात आंब्याला मोहोर येण्यास प्रारंभ होतो. मागील दोन वर्षात पावसाचा अनियमितपणा व गारपीट, वादळी वारे यामुळे मोहोराचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आंबा उत्पादनात घट झाली होती. याचा व्यापारी व शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. मात्र यंदाच्या वर्षात सुरुवातीपासून पावसाळा अखेरपर्यंत अधुन मधून सतत चांगल्या प्रमाणात पाऊस पडल्याने फळांचा राजा आंबा या झाडाला मोहर भरल्याने शेती शिवार फुलून दिसत आहे.
अलीकडे अनेक शेतकऱ्यांनी शेतीतील उत्पन्न वाढविण्यासाठी व विकसित शेती करण्याच्या विचाराने काही शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत एक ते दोन एकर याप्रमाणे स्वतंत्र आंब्याच्या बागा उभारल्या आहेत. त्यामुळे परिसरात आंबा लागवड मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे यंदा अपेक्षेपेक्षा जास्त थंडी असल्यामुळे लहान-मोठ्या आंब्याच्या झाडाला मोहोर आला आहे.
मोहर येऊन फळधारणा झाल्यास आंबा मार्चअखेर बाजारात येईल असे शेतकरी बांधवातून बोलले जात आहे. एकंदरीत यावर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे झाडांची वाढही जोमदार झाली असून, शिवारातील गावरान आंब्याच्या झाडा सह केशर, हापूस, नीलम या आंब्याच्या झाडाला मोहर बहरला आहे. एकंदरीत यंदा आंब्याची चव मोठ्या प्रमाणावर चाखायला मिळणार असल्याचे शेतकऱ्यांकडून आनंदाने सांगितले जात आहे.